इचलकरंजीकरांसाठी आ. प्रकाश आवडे आक्रमक…

इचलकरंजी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना पाटबंधारे विभागाने कृष्णा योजनेचा पाणी (water supply) उपसा बंद केला हे दुर्दैवी असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना केला. त्याचबरोबर वस्त्रोद्योगाशी निगडीत प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
कोल्हापूरनंतर इचलकरंजी हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरात प्रांत कार्यालय आहे, पण तहसिल कार्यालय नाही. ते इचलकरंजीत व्हावे या संदर्भात चर्चासुध्दा झाली होती. पण त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यानंतर पुनश्च चर्चा होऊन हा प्रश्न कॅबिनेटपर्यंत गेला होता. पण काय झाले माहित नाही सांगली जिल्ह्यात तालुका वाढला आणि कोल्हापूर जिल्हा मागे राहिला. पण आता शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण लक्षात घेऊन इचलकरंजीत तहसिल कार्यालय होण्याबाबत गांभिर्याने विचार होऊन निर्णय व्हावा, असे सांगितले.
इचलकरंजी हे सव्वातीन लाख लोकसंख्येचे गाव आहे. याठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना पाटबंधारे विभागाने थकबाकीपोटी कृष्णा योजनेचा मजरेवाडी येथील पाणी उपसा बंद केला आहे. पण पैसे का भरले जात नाही याकडे कोणी लक्ष देत नाही. राज्य शासनाकडून नगरपरिषदेला ऑक्ट्रॉय अनुदानपोटी 32 कोटी रुपये येणे आहे. शहरवासियांना टंचाई जाणवू नये म्हणून नगरपरिषदेने पैसे भरले असतानाही उपसा बंद केल्याबद्दल संताप व्यक्त केला. शहरासाठीची वारणा योजना रखडली आणि शासनाने सुळकूड योजना मंजूर केली, पाणी कोठूनही द्या, पण शहराचे सुरु असलेले पाणी बंद करुन गंभीर परिस्थिती निर्माण करु नका, असे ते म्हणाले.
राज्यातील कोणत्याही नदीतील गाळ (water supply) काढला जात नाही हे दुर्दैव असल्याचा उल्लेख करत गाळ काढण्याबाबत निर्णय झाल्यास नदीतील पाणी साठ्याचा प्रश्न सुटेल, असे सांगितले. 1985 पासून मी सदस्य असून आजपर्यंत सभागृहात नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी असा प्रकार घडला नाही. याठिकाणी आम्ही नागरिकांचे प्रश्न मांडायला येतो, अर्थसंकल्पावर मुक्तपणे चर्चा व्हायला हवी असे असताना बोलूच दिले जात नसल्याबद्दल संतप्त भावनाही व्यक्त केल्या.
इचलकरंजीतील खर्चीवाला यंत्रमागधारक व यंत्रमाग कामगार यांच्या मजुरीवाढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नासंदर्भात कामगारमंत्र्यांनी लक्ष घालून तो मार्गी लावावा अशी मागणी केली. तसेच यंत्रमाग कामगार, घरेलु कामगार व व रिक्षावाला यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा असे सांगितले. त्याचबरोबर हातकणंगले व शिरोळ तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्याची मागणीही आमदार आवाडे यांनी यावेळी केली.
हेही वाचा :