कोल्हापुरात महापूर आला तरी वीजपुरवठा होणार नाही खंडित!

कोल्हापूर जिल्ह्याला मागच्या तीन वर्षात महापुराने (flood) दोनवेळा नुकसान झाले. शेती बरोबर अन्य गोष्टींचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान महापूर ओसरल्यानंतर सर्वात महत्वाचे काम असते ते म्हणजे आपल्या घरातील किंवा शेतीतील वीज (msedcl)चालू होणे हा महत्वाचा भाग असतो. कोल्हापूर जिल्हा वीज बिले थकीत न राहणार राज्यात पहिला जिल्हा म्हणून ओळख आहे. यामुळे जिल्ह्यातील 2019 व 2021 या वर्षातील महापूरासह कोरोना काळात कोल्हापूर महावितरणची कामगिरी उल्लेखनीय केली आहे. दरम्यान यंदाही पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने महावितरणने योग्य उपाययोजना केल्या आहेत.
संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी पुर्वानुभव व पूर्वतयारीच्या बळावर (msedcl) महावितरणने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामे करण्यास सुरू झाली आहेत तर पूराचा धोका लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पूरजन्य स्थिती हाताळण्यासाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण व अतिरिक्त साधन सामुग्रीची उपलब्धता महावितरणकडून करण्यात आली आहे.
मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे
मागच्या तीन वर्षातील पूरस्थिती लक्षात घेऊन नदीपात्र व त्याजवळील वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. 14 हजार 653 वीज वाहिन्यांच्या गाळ्यातील वीज तारा ओढून घेण्यात आलेल्या आहेत. पूर प्रभावित भागातील 1780 वीज खांबांचे सक्षमीकरण व देखभाल दुरूस्ती करण्यात आले आहे.
पूराचा धोका लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना
वितरण रोहित्रांमध्ये पूराचे पाणी जाऊ नये म्हणून आतापर्यंत 350 रोहित्रांच्या टॉपप्लेट आवळून घेऊन त्याला चिकट द्रव्य लावण्यात आले आहे. जून महिन्यानंतर (कृषिपंपांचा वापर बंद झाल्यानंतर) सुमारे 450 रोहित्रे स्थलांतर करण्याची योजना करण्यात आली असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पावसाळा संपल्यानंतर ते पुर्ववत बसविण्यात येतील अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. गावातील सरपंच व पोलिस पाटील यांच्याशी या संदर्भाने समन्वय साधला जाणार असल्याने पूराचे पाणी ज्या उपकेंद्रात जाते त्याठिकाणी अतिरिक्त बॅटरी चार्जर व रिले उपलब्ध करण्यात आले आहेत. जेणेकरुन पूराचे पाणी ओसरल्यावर नियंत्रण कक्ष त्वरीत चालू करता येईल. विद्युत साहित्य व उपकरणे कोरडी करण्यासाठी महावितरणने गॅसवर आधारीत पूरेसे हॉटब्लोअर्स विकत घेतल्या सांगण्यात आले.
पूरजन्य स्थिती हाताळण्यासाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण
महावितरणने कर्मचाऱ्यांना आपातकालीन परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळून जलद कामे करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. महावितरणकडे 215अभियंते, 1176 तांत्रिक कर्मचारी, 1059 बाह्य स्त्रोत कर्मचारी, 976 ठेकेदाराचे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लाइफ जॅकेट, बोट, सर्चलाईट, रबरी हात मोजे, झुले आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.
अतिरिक्त साधन सामुग्रीची उपलब्धता
पूर परिस्थिती लक्षात घेऊन 407 रोहित्र, 2000 वीज खांब, 73 किलोमीटर केबल, 103 किलोमीटर विज तारा, 2100 वीज मीटर इत्यादी साहित्य उपलब्ध करून ठेवले आहे. त्यासोबतच 40 वाहने, 5 क्रेन भाडेतत्वावर व 1 बूम वाहन उपलब्ध ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा :