महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे. काही दिवसांवर येवून ठेपलेल्या निवडणुकीआधी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे हे पाच माजी नगरसेवक मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

आज दुपारी एक वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम (BJP)भाजप पक्ष कार्यालयात पार पडणार आहे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगिता ठोसर आणि प्राची आल्हाट हे नगरसेवक शिवबंधन सोडून कमळ हाती घेणार आहेत, एकीकडे पक्षप्रवेश होत असतानाच दुसरीकडे पक्षातील नाराजी समोर येत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश देत असल्याने नाराजीनाट्य सुरू झालं आहे. या पाच माजी नगरसेवकांच्या संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांवरती सध्या टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे इच्छुकांनी नाजारी दर्शवली आहे.
त्याचबरोबर इच्छुकांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत झोकून काम केलं, त्यानंतर आता महापालिकेसाठी उमेदवारी मिळण्याची आस असतानाच या पाच प्रभागामध्ये नव्याने पक्षप्रवेश झालेल्यांना संधी मिळाली तर पक्षासाठी काम करूनही डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने इच्छुकांकडून पक्षसंघटनेतील पदाधिकार्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधितांना पक्षात घेऊ नये, अशीही मागणी केली जात होती. मात्र, आज या पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या पक्षातील या पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेत असतानाच भाजपमधील काही नेत्यांबरोबरच संघटनेतील नेत्यांनाही विश्वासात घेतले गेलं नसल्याच्या चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
त्यामुळे या राच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याबाबत पक्षातच काहींमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. त्यामुळे रविवारी होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, या पाच जणांचा पक्षप्रवेश आज (मंगळवारी दि. 7) मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2017 मध्ये पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडे तितके सक्षम आणि निवडून येणारे उमेदवार नव्हते. त्यामुळे त्या निवडणुकीवेळी भाजप पक्षाने इतप पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस या पक्षातून उमेदवार घेऊन भाजपने निवडणूक लढली होती आणि मोठी मजल मारली होती, त्या निवडणुकीमध्ये मोठं बहुमत मिळवण्यात भाजपला यश आलेलं होतं.
त्यानंतर आता गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील राजकीय चित्र पालटलं आहे, परिस्थिती बदलली आहे. भाजप पक्षाकडे इच्छुकांची मोठी रांग आहे. अनेक सक्षम आणि इच्छुक उमेदवार पक्षाकडे असतानाच आणि महापालिकेची पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्यामुळे हा पक्षप्रवेश का याची चर्चा आहे, नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याने त्या प्रभागात सक्षम उमेदवार आहे की नाही, याबाबातचं चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तसेच, महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार? हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं असतानाही पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याची घाई का? असा सवालही काही पदाधिकार्यांनी उपस्थित केलं आहे.
हेही वाचा :
फीट राहण्यासाठी आरशाची मदत! लवकरच येतोय ‘Smart Mirror’ चेहऱ्यावरून देईल हेल्थ अपडेट्स
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
HMPV व्हायरसवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, राज्यात….