…तर विराट 41 वरच Out झाला असता! कोहलीची ‘ती’ कृती पाहून गावस्कर संतापले…

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाला 6 विकेट्स राखून पराभूत केलं. भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली. विराटने(Virat Kohli) भारताला विजय मिळवून देणारा चौकार लगावताना स्वत:चं शतकही पूर्ण केलं. विराटचं हे पाकिस्तानविरुद्धचं चौथ तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिलेच शतक ठरले. विराटच्या संयमी खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला.

पाकिस्तानच्या संघाला विराटचा(Virat Kohli) शेवटपर्यंत बाद करता आलं नाही. असं असलं तरी पाकिस्तानच्या संघाच्या नजरेतून एक गोष्ट सुटल्याने विराट थोडक्यात बचावल्याची सध्या चर्चा आहे. ही गोष्ट पाकिस्तानच्या लक्षात आली असती तर कदाचित विराट 21 व्या ओव्हरमध्येच बाद झाला असता. विराट कोहली त्यावेळी अवघ्या 41 धावांवर खेळत होता आणि भारताची धावसंख्या 115 वर दोन गडी बाद असा होता. कॉमेंट्री बॉक्समधून ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही यावरुन विराटला झापलं.

झालं असं की, सामन्यातील 21 व्या ओव्हरमध्ये हरीस रौफ गोलंदाजी करत होता. विराटबरोबर मैदानात श्रेयस अय्यरची जोडी जमली होती. याच ओव्हरमध्ये नॉन स्ट्रायकर एण्डला पळून एक धाव घेतल्यानंतर विराटने पाकिस्तानी खेळाडूने स्टम्पच्या दिशेने फेकलेला चेंडू क्रिझमध्ये पोहचल्यानंतर अडवण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे विराटने थेट हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो क्रिजमध्ये पोहचला होता. मात्र त्यानंतर त्याने चेंडू हाताने अडवण्याचा प्रयत्न का केला हे न उलगडलेलं कोडं आहे. चेंडू आडवण्यासाठी मागे पाकिस्तानचा बॅकअप खेळाडूही नव्हता. त्यामुळे भारताला अधिक धाव घेण्याची संधीही मिळाली असती. कॉमेंट्री बॉक्समधून गावसकरांनी हेच सांगितलं.

विराटने केलेला हा प्रकार पाहून गावसकर संपातलेले दिसले. त्यांनी पाकिस्तानने अपील केलं असतं तर विराट पुन्हा तंबूत परतताना दिसला असता. एवढं छान सेट झालेलं असताना विराटसारख्या खेळाडूने अशा गोष्ट्टी टाळायला हव्यात, असं गावसकर म्हणाले. “विराटला हे असं करायची काहीच गरज नव्हती.

उलट मागे पाकिस्तानी खेळाडू बॅकअपला नव्हता तर अतिरिक्त धाव घेता आली असती. तसेच पाकिस्तानी खेळाडूंनी अपील केली असती तर फिल्डींगमध्ये अडथळा आणतो म्हणून विराटच अडचणीत आला असता आणि कदाचित बादही ठरला असता,” असं गावसकर म्हणाले.

क्रिकेटच्या नियमांनुसार एमसीसीच्या नियमावलीतील 37.3 तरतुदीमध्ये स्वइच्छेने फलंदाजाने फिल्डींगमध्ये अडथळा निर्माण केला तर त्याला बाद ठरवण्यात येऊ शकतं. हा अडथळा प्रत्यक्ष कृतीमधून किंवा शब्दांच्या माध्यमातून आणलेला असू शकतो. चेंडूचा हात लावण्यासारख्या प्रकराचा यामध्ये येतो.

चेंडू अगदी नो बॉल असेल किंवा डेड बॉल असेल तरी हा नियम लागू होतो. अगदीच धावपळीत चेंडू अडवला गेला असेल किंवा दुखापत होऊ नये म्हणून चेंडू अडवला तर खेळाडूला बाद ठरवता येत नाही असं नियम सांगतो. या नियमानुसार पाकिस्तानने अपील केली असती तर कदाचित विराटला खरोखरच बाद ठरवण्यात आलं असतं आणि सामन्याचं चित्रही पालटलं असतं.

हेही वाचा :

1 मार्च ‘या’ 5 राशींसाठी ठरणार वरदान! नोकरीत पगारवाढ, धनवैभव, आणि संपत्तीचे वरदान मिळेल

आता एकाच वेळी दोन पदव्या मिळवा; विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी

दोन भावांच्या भांडणात धाकटा भाऊ पडला विहिरीत; छातीला मार लागला अन्…