रोहित शर्मा – हार्दिक पांड्या कॅप्टन्सी वादावर अखेर Jasprit Bumrahने मौन सोडले

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या चर्चेत राहिली ती मुंबई इंडियन्सच्या(Rohit Sharma) एका निर्णयामुळे. पाच जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माची हकालपट्टी करून फ्रँचायझीने नेतृत्व हार्दिक पांड्याकडे दिले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. Mumbai Indians च्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांनी हार्दिकची हुर्यो उडवली. मैदानावर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने हार्दिकला खूप टीकेला सामोरे जावे लागले.

हार्दिकला कॅप्टन(Rohit Sharma) केल्यानंतर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याची एक पोस्टही चर्चेची ठरली होती, ज्यावरून बुमराह या निर्णयावर नाराज असल्याचा अंदाज लावला गेला. परंतु अखेर जसप्रीत बुमराहने त्या सर्व प्रकरणावर व्यक्त होत, आपले मत मांडले आहे.

हार्दिकने भारताला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इंडियन एक्सप्रेस कट्ट्यावर जसप्रीतने मुंबई इंडियन्सच्या त्या निर्णयानंतर सुरू झालेल्या वादावर त्याचे मत व्यक्त केले. “आपण अशा देशात राहतो की तिथे भावनांना खूप महत्त्व आहे. फॅन्सच्या भावनांचा आम्ही आदर करतो. खेळाडूही भावनिक असतात. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय खेळाडू म्हणून तुमच्यावर होतो. परंतु, तुमचे स्वतःचेच चाहतेही नीट बोलत नाही. मात्र, त्यावेळेसही तुम्हाला चेहऱ्यावर हसू ठेवावे लागले. तुम्ही लोकांना कसे थांबवू शकता? तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रीत केलं, तर ही टीकेची दारं तुम्ही बंद करू शकता. हे सोपं नाही. ते तुमच्यावर नजर रोखून असतात आणि तुम्हाला त्याचं म्हणणं ऐकू येतं,” असं जसप्रीत म्हणाला.

“पण मग तुमचे अंतर्मन मदत करते. आम्ही एक संघ म्हणून अशा गोष्टींना प्रोत्साहन देत नाही. एक संघ म्हणून आम्ही त्याच्यासोबत होतो. आम्ही त्याच्याशी बोलत होतो. त्याचे कुटुंब नेहमीच तिथे असेल. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात. पण, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या गोष्टी बदलल्या,” असेही बुमराहने इंडियन एक्सप्रेस अड्डा वर म्हटले.

तो पुढे म्हणाला, “तुम्ही त्या गोष्टी गांभीर्याने घेऊ शकत नाही. आता लोकं तुमचं कौतुक करत आहेत, याचा अर्थ टीका संपलेल्या नाहीत. जेव्हा आपण एखादा सामना गमावतो, तेव्हा ती टीका पुन्हा होऊ शकते. कारण आपण एक असा खेळ खेळतो जो खूप लोकप्रिय आहे. आम्ही पाहतो की जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या सर्व गोष्टींचा सामना करतात.”

हार्दिकवरील टीकेवर जस्सी पुन्हा म्हणाला की, “एक संघ म्हणून एका माणसाला मागे सोडू शकत नाही. आम्ही एकमेकांसाठी आहोत. आम्ही एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी हार्दिकसोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, पण तो माझ्यापेक्षा तरुण असू शकतो. आम्ही एकत्र होतो आणि त्याला गरज पडली तेव्हा मदत करण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा :

सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या : संजय राऊत

‘लाडकी बहीण’ अडचणीत; सरकारच्या तिजोरीवर येणार ४६००० कोटींचा बोजा

शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार; ठाकरे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याची पुन्हा घरवापसी