देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असते. आता देखील कंपनी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर त्यांच्या युजर्ससाठी नवीन फीचर लाँच(launch) करणार आहे. हे फीचर युजर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे, कारण या फीचरच्या मदतीने युजर्सच्या पैशांची बचत होणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या फीचरचं नाव आहे JioSoundPay हे फीचर अद्याप सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेलं नाही, मात्र लवकरच ही सेवा सर्वांसाठी सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
प्रजासत्ताक दिनी जिओ JioSoundPay सेवा लाँच(launch) करणार आहे. हे वैशिष्ट्य JioBharat फोनवर आजीवन मोफत उपलब्ध असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. वास्तविक, तुम्ही कोणत्याही साउंड बॉक्सशिवाय JioSoundPay वरून UPI पेमेंटसाठी अलर्ट मिळवू शकता. भारतातील कोणत्याही मोबाईल फोनवर उपलब्ध असलेले हे पहिलेच वैशिष्ट्य आहे. देशातील 5 कोटीहून अधिक लघु उद्योजक आणि छोट्या व्यापाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, JioSoundPay ही एक महत्त्वाची ग्राउंडब्रेकिंग इनोवेशन आहे. जे प्रत्येक UPI पेमेंटचा झटपट आणि मल्टीलिंगुअल ऑडियो अलर्ट संदेश देईल. यामुळे लहान किराणा दुकाने, भाजी विक्रेते आणि रस्त्यालगत खाद्यपदार्थ विक्रेते यांना व्यवसाय करणे सोपे होणार आहे. सध्या लहान-मोठे व्यापारी साउंड बॉक्ससाठी दरमहा सुमारे 125 रुपये खर्च करतात. मात्र आता त्यांच्या या पैशांची बचत होणार आहे. JioSoundPay वर आता मोफत उपलब्ध असलेल्या या सेवेमुळे, JioBharat फोन वापरकर्ते वार्षिक 1,500 रुपयांपर्यंत बचत करू शकतील.
JioBharat फोन सुमारे एक वर्षापूर्वी लाँच करण्यात आला होता आणि हा जगातील सर्वात परवडणारा 4G फोन मानला जात आहे. या फोनची किंमत फक्त 699 रुपये आहे. अशा प्रकारे, कोणताही व्यापारी नवीन JioBharat फोन खरेदी करून फोनची संपूर्ण किंमत केवळ 6 महिन्यांत वसूल करू शकतो. उद्या भारतात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने Jio JioSoundPay वर आधुनिक संगीतासह वंदे मातरम सादर होणार आहे.
जिओचे अध्यक्ष सुनील दत्त म्हणाले की, ‘तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सक्षम व्हावं यासाठी जिओ प्रयत्न करत आहे. 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना JioBharat वर मोफत JioSoundPay वैशिष्ट्य आणि वंदे मातरम सादर केलं जाणार आहे. आम्ही 26 जानेवारीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत आणि खऱ्या डिजिटल इंडियाच्या निर्मितीसाठी आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत.’
गेल्या वर्षी टेरिफ प्लॅनच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीनंतर अनेक युजर्सनी जिओची साथ सोडली. जिओ युजर्स कमी होत असतानाच बीएसएनएल युजर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. सलग चार महिने ग्राहक गमावल्यानंतर, रिलायन्स जिओने नोव्हेंबरमध्ये वायरलेस वापरकर्ते जोडले. तर सरकारी कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) गेल्या चार महिन्यांत अनेक युजर्स गमावले. इतर खाजगी दूरसंचार कंपन्या – भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी देखील नोव्हेंबरमध्ये ग्राहक गमावले. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे.
हेही वाचा :
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच भारताला पहिला झटका
आता दुसऱ्याच्या बँक खात्यातूनही करता येणार पेमेंट; UPI चे नवे फीचर
रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला; विकेट घेणाऱ्या साडेसहा फुटी बोलरला धू धू धुतला