रेल्वे प्रवाशांना विषबाधा, यशवंत-गोरखपूर एक्स्प्रेसमधील प्रकार; नेमकं काय घडलं?

तसेच (nagpur) स्थानकावरील जनआहारमधूनही काही पार्सल देण्यात आले. प्रवाशांनी ही अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर तीन-चार तासांनी गाडी इटारसीजवळ


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर(nagpur) : धावत्या रेल्वेगाडीत खाल्लेल्या अंडा बिर्याणीमुळे जवळपास ९० प्रवाशांना विषबाधा झाल्याने त्यांना विविध शहरांतील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. २२५३४ यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली असून, नागपूर आणि बल्लारशा स्थानकावरील जनआहारचे स्टॉल खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आले आहेत.
-सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंतपूरवरून निघालेली ही गाडी गोरखपूरकडे जात असताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशा स्थानकावरील जनआहारमधून या गाडीत अंडा बिर्याणीचे जवळपास दोनशे पार्सल पाठविण्यात आले.
-तसेच नागपूर स्थानकावरील जनआहारमधूनही काही पार्सल देण्यात आले. प्रवाशांनी ही अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर तीन-चार तासांनी गाडी इटारसीजवळ असताना प्रवाशांना मळमळ, ओकाऱ्या, पोटदुखी असे त्रास सुरू झाले.

-हे वेगवेगळ्या कोचमध्ये घडत होते. सुरुवातीला याची माहिती कोणाला नसल्याने फार गांभीर्याने कुणी घेतले नाही. मात्र, अनेक कोचेसमध्ये प्रवाशांना अशीच लक्षणे असल्याचे लक्षात येताच खळबळ उडाली.
-गाडीतील सूत्रांनी याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर गाडी कानपूरला पोहोचली असता तेथे डॉक्टरांचे पथक गाडीत आले व त्यांनी उपचार सुरू केले. दरम्यान, गंभीर प्रवाशांना इटारसी, कानपूर, झाशी येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

-ही गाडी नागपूरमार्गे आली असल्याने नागपूर विभागाला याबाबत कळवण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी तातडीने चौकशी सुरू केली व नागपूर तसेच बल्लारशा स्थानकावरील जनआहारमधील सर्व खाद्यपदार्थांची विक्री तातडीने थांबविण्यात आली.

खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीला
‘असा प्रकार घडला, हे खरे आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित दोन्ही स्टॉलवरील विक्री थांबविण्यात आली आहे. तसेच तेथील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या स्टॉलवरील खाद्यपदार्थांमुळे विषबाधा झाली किंवा नाही, हे स्पष्ट होईल’, असे नागपूर विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी ‘मटा’ला सांगितले.

हेही वाचा :

सांगलीची जागा देणे चुकीचेच, कारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही.. विश्वजित कदम कडाडले!

आमच्या भावना समजून घ्या…, सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात विशाल पाटील समर्थकांनी घातला गोंधळ

“तीन जागांसाठी तीन महिने गेले त्यात सांगली,…”; विश्वजित कदमांच्या रुद्रावतारावर बाळासाहेब थोरातांचा शांत उतारा!