कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : घरातील गुप्तधन शोधण्याचा एक अघोरी प्रकार राधानगरी(years) तालुक्यातील कौलव या सधन गावात नुकताच उघडकीस आला. हे गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न संबंधितांकडून केला जाणार होता काय? याचा तपास राधानगरी पोलिसांकडून सुरू आहे. या निमित्ताने पन्नास वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील मानवत येथे घडलेल्या नरबळी कांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये मानवत(years) हे तालुक्याचे ठिकाण आहे. आता तेथे नगरपालिका आहे पण 50 वर्षांपूर्वी तिथे ग्रामपंचायत होती. उत्तम बाराहाते हा त्या गावचा सरपंच होता. त्याची पत्नी रुक्मिणी. लग्न होऊन अनेक वर्षे झाली पण त्यांना संतती होत नव्हती. येथील एका भोंदू बाबाने सरपंचाला एक अघोरी सल्ला दिला. कुमारी बालिकेचा बळी द्यायचा आणि तिच्या रक्ताने देवीला अभिषेक घालायचा. असा हा अघोरी प्रकार केला तर संतती निश्चित होईल. सरपंचावर अंधश्रद्धेचा भलताच पगडा होता. त्याने हा अघोरी प्रकार करण्याचा निर्णय घेतला.
गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का असलेल्या एका जमातीच्या काही जणाना सरपंचाने आपल्या हाताशी धरले. त्यानंतर मानवत आणि आसपासच्या परिसरात लहान मुली गायब होण्याचे सत्र सुरू झाले. अपहरण झालेल्या मुलींचे मृतदेह सापडू लागले. मृतदेहाची एकूण अवस्था पाहून या मुलींचा बळी देण्यात आला आहे यावर पोलिसांचे एकमत झाले. तपास सुरू झाला पण संशयित आरोपींचा थांगपत्ता लागेना. दर चार-पाच दिवसानंतर एखाद्या बालिकेचे अपहरण होऊ लागले आणि नंतर तिचा मृतदेह सापडू लागला. मुलींचा बळी देण्याची मालिकाच सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र हादरला.
मानवत मध्ये तर रात्री स्मशान शांतता दिसू लागली. लोक भयभीत झाले होते. मुलींना घराबाहेर सोडण्यास कोणी तयार नव्हते. स्थानिक पोलिसांना तपासात अपयश येऊ लागले. या गुन्हे मालिकेचा छडा लावा म्हणून सामान्य माणसाचे दडपण पोलीस प्रशासनावर येऊ लागले. शेवटी राज्य शासनाने याची अतिशय गंभीरपणे दखल घेऊन मुंबई पोलीस दलातील रमाकांत कुलकर्णी, विनायक वाकटकर या पोलीस हुशार अधिकाऱ्यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली. हे दोन अधिकारी मानवत मध्ये तळ ठोकून होते. सर्व प्रकारच्या शक्यता गृहीत धरून त्यांनी तपास सुरू केला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक श्री राजाध्यक्ष यांना मानवतला धाडले. त्यानंतर युद्ध पातळीवर तपास सुरू झाला आणि मानवत चा सरपंच उत्तम बाराहाते आणि त्याची पत्नी रुक्मिणी बाराहाते व इतर सात ते आठ जणांना तपास पथकाने अटक केली.
मानवता नरबळी कांडातील सर्व संशयीतांना अटक केल्यानंतर मानवत येथील नरबळी सत्र थांबले पण आठच दिवसांनी बाभूळतारा हत्याकांड सुरू झाले. त्यामुळे हे हत्याकांड नेमके कोण करतय याबद्दल सामान्य माणसात संभ्रम निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी बाराहाते दांपत्यासह काहीजणांच्या वर दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायालयाने, सर्वच आरोपींना देह दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने चौघा आरोपींची देह दंडाची शिक्षा कायम ठेवून इतरांची मुक्तता केली.
इसवी सन 1980 च्या दरम्यान पुणे येथील येरवडा कारागृहात मानवत(years) नरबळी कांड प्रकरणातील चौघा जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीच्या शिक्षेची एकूण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहायला मिळावी म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिकाने, राज्य प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. त्यांना ती परवानगी मिळाली की नाही हे गुलदस्त्यातच राहिले. पण नंतर या साहित्यिकांनी लिहिलेल्या एका पुस्तकात या चौघांच्या फाशीच्या शिक्षेचे अंगावर शहारे येणारे प्रकरण लिहिले आहे. संतती होत नाही म्हणून कुमारी बालिकांचा देवीसमोर बळी देऊन तिच्या रक्ताचा अभिषेक घालण्याचा हा महाराष्ट्रातील तेव्हा पहिलाच प्रकार होता. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. प्रिंट मीडियातून या नरबाळी कांडा ची तेव्हा वृत्त मालिका प्रसिद्ध झाली होती.
हेही वाचा :
धक्कादायक! शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला…
शेवग्याच्या शेंगाच नव्हे पानंही आहेत बहुगुणी; फायदे वाचाल तर अवाक् व्हाल
दीड हजार मिळवणं आणखी सोप्पं, सरकारने केला ‘हा’ मोठा बदल