हे जाणार दुसऱ्याच्या मांडवात त्यांचा “राज”मंडप रिकामाच!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या(mandap). तेरा आमदारावरून एका आमदारावर आले. मतांच्या टक्केवारीची घसरण झाली. लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेच नाहीत. त्यांची राजकीय भूमिका कायम एकला चलो रे ची. युती, आघाडी हे राजकीय तडजोडीचे प्रकार त्यांना मान्य नाहीत. ते जाणार दुसऱ्याच्या मांडवात, त्यांचा मात्र मंडप रिकामाच. म्हणजे दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन तिसरा कसा संधी साधू आहे. त्याच्याकडे विकासाची दृष्टी कशी नाही हे आपल्या ठाकरी शैलीत सांगून सभांचा फड जिंकणार. गुलाल दुसऱ्यावर आणि हे मात्र कोरडे ठाक! आता अमेरिकेत जाऊन “एकदा महाराष्ट्र माझ्या हातात द्या”असे आवाहन त्यांनी केले आहे. तर हे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे राजकारण!

लोकसभा निवडणुका झाल्या(mandap), निकाल लागले, नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. लोकांनी मोदीविरोधी मतदान केले अशी एका ओळीची प्रतिक्रिया त्यांनी दिली. नंतर ते मीडिया तून गायब झाले. अचानक बातमी आली की राज ठाकरे सपत्नीक अमेरिकेस रवाना.

अमेरिकाच्या सेंन होजे येथील मराठी मंडळींनी त्यांना खास आमंत्रित केले होते. तेथे त्यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर, विचारांवर, महाराष्ट्रात मत मतांतरे व्यक्त झाली किंवा चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी सर्वच राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्ष संघटनांना जमिनीवर आणले असे राज ठाकरे तेथील मुलाखतीतून म्हणाले. तर शरद पवार यांनी आम्ही जमिनीवरच आहोत असा पलटवार करून एक वेगळ्या प्रकारची त्यांना दाद दिली.

भारतात लोकशाही नाही. जगातली मोठी लोकशाही म्हणजे प्रचंड लोकसंख्या या अर्थाने म्हटले जाते. भारतापेक्षा अमेरिकेचे लोकशाही रुजली आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय पुरस्कार घेणारी व्यक्ती राष्ट्रप्रमुखाच्या विरोधात बोलू शकते असेही त्यांनी या प्रकट मुलाखतीत म्हटले आहे. एकदम महाराष्ट्र माझ्या हातात द्या असे आवाहनही त्यांनी तेथे केले आहे. म्हणजे ते त्यांच्या काकांची भाषा तेथे बोलताना दिसले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकशाहीची नव्हे या देशाला लोकशाहीची गरज आहे असे आपल्या भाषणातून सांगत असत. काँग्रेस राजवटीवर तुटून पडताना मला एक दिवसासाठी देशाची सत्ता द्या मी सारा देश नीट करून दाखवतो असेही त्यांनी अनेकदा म्हटले होते.

राज ठाकरे हे महाराष्ट्राचे सत्ता माझ्या हातात द्या असे आवाहन करतात. सध्याचे राजकारण युती आणि आघाडी यांचे आहे. एक हाती सत्ता कुणालाही मिळवता येत नाही हे वास्तव आहे आणि हे त्यांनाही माहित आहे. नाशिक महापालिकेची सत्ता त्यांनी एक हाती मिळवली होती पण नंतरच्या निवडणुकीत त्यांचे “पाणी” पत झाले होते. महाराष्ट्राचे सत्ता मिळवायचे असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात मजबूत संघटन हवे.

लोकसभा निवडणुकीनंतर मनसे 225 जागा लढवणार अशी त्यांनी घोषणा केली खरी, पण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या महानगरांच्या शिवाय उर्वरित महाराष्ट्र मोठा आहे आणि तेथे मनसे मजबूत नाही. त्यामुळे स्वबळ दाखवताना त्यांना आधी उमेदवार शोधावे लागतील.

विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात मनसेचे तेरा आमदार(mandap) निवडून आल्यावर नंतरच्या निवडणुकीत 13 चे किमान 33 आमदार निवडून येणे अपेक्षित होते. पण नंतरच्या दोन्ही निवडणुकीत मनसेची “तीन तेरा”अशी अवस्था झाली. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता मला द्या असे आवाहन करताना निवडणूक जिंकण्याचे कोणते लॉजिक त्यांच्याकडे आहे हे समजण्यास मार्ग नाही. शरद पवार यांना या राज्याची एक हाती सत्ता घेता आली नाही. शिवसेनेलाही स्वतःचा मुख्यमंत्री (मनोहरपंत जोशी) करताना भाजप सोबत असूनही अपक्ष आमदारांचे समर्थन घ्यावे लागले होते.

महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना, उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडून इतर राजकीय मित्र शोधल्यानंतर राज ठाकरे यांना महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत करण्याची मोठी संधी होती पण ती त्यांनी गमावली.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी काही जाहीर सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची शेवटची जाहीर सभा झाली. म्हणजे त्यांनी दुसऱ्याच्या मांडवात जाऊन स्वतःचा मंडप रिकामाच ठेवला. म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात तिसऱ्याच्या नावाने हळद खेळण्यातला हा प्रकार म्हणावा लागेल.

हेही वाचा :

राजू शेट्टीचा सरकारला इशारा, ‘शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, नाहीतर…’

पलक तिवारीच्या फोटोंवर इब्राहिम अली खानची ‘फायर’ कमेंट, नेटकरी म्हणाले “रिलेशनशिप कन्फर्म?”

जुलै महिन्यातील आर्थिक बदल: आयटीआर, पेटीएम वॉलेट, एसबीआय आणि आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड नियम