व्होट जिहाद, संविधान वगैरे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आणखी एक दिवसांने म्हणजे सोमवार(constitution law) दिनांक 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि उत्तर प्रदेश नंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रातच असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. इंडिया आघाडीने तर भारतीय जनता पक्षाच्या शेवटाचा प्रारंभ महाराष्ट्रातूनच करायचा असा निर्धार करून प्रचाराचे रान उठवले होते.

पाचव्या टप्प्यात महायुतीने व्होट जिहाद वर आणि महाविकास आघाडी(constitution law) अर्थात इंडिया आघाडीने संविधान धोक्यात यावर भर दिला होता. शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीची आणि बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची पाचव्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली. मुंबई कोणाची, महाराष्ट्र कोणाचा याचा फैसला दिनांक चार जून रोजी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर या देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत असा इशारा इंडिया आघाडीच्या प्रचार सभा मधून देण्यात आला होता तर देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना संधी द्या असे आवाहन भारतीय जनता पक्ष व एनडीए आघाडी कडून केले गेले होते.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करून इंडिया आघाडीला सत्तेमध्ये का आणले पाहिजे याचे विवेचन केले गेले होते. तर भारतीय जनता पक्षाकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता आणि आम्ही काय करणार आहोत हे दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य मतदारांना सांगितले होते.

तिसऱ्या टप्प्यात इंडिया आघाडीकडून नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना प्रचाराच्या माध्यमातून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दोन्हीकडून आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आले. कोण किती खोल पाण्यात आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला.

पाचव्या टप्प्यात मात्र हिंदू मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने व्होट जिहादचे अस्त्र बाहेर काढले. तर इंडिया आघाडीकडून अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कडून संविधान धोक्यात असल्याचा इशारा दिला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवावयाचे असेल, सर्वसामान्य माणसाचे अधिकार अबाधित ठेवावयाचे असतील तर भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांना सत्तेतून बाहेर खेचा असे आवाहन करण्यात आले. अब की बार नरेंद्र मोदी तडीपार अशा घोषणा देण्यात आल्या.

भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून संविधान बदलले जाणार हा इंडिया आघाडीचा अपप्रचार असून भारतीय संविधान कोणाच्याही बापाला बदलता येणार नाही असे एनडीए कडून इंडिया आघाडीला ठणकावून सांगण्यात आले. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात व्होट जिहाद आणि संविधान या दोनच मुद्द्यावर दोन्हीकडून परस्परांवर हल्ले चढवण्यात आले.

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या 18 व्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक वेळा महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाच्या हातातून जातो आहे अशी भीती वाटत असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक सभा महाराष्ट्रात घेतल्या अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडून करण्यात आली. मोदी यांच्या सर्वाधिक सभा महाराष्ट्रात झाल्या हे खरेच आहे पण यंदाच्या निवडणुका सात टप्प्यात असल्यामुळे प्रचारासाठी उपलब्ध असलेला वेळ, त्यांनी महाराष्ट्रातील सभेसाठी उपयोगात आणला असेही म्हणता येईल.

नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे पंतप्रधान म्हणून मिळाली तर या देशातील विरोधी पक्ष फार मागे जाईल. त्यामुळे आता नाही तर मग कधीही नाही असा विचार करून इंडिया आघाडीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईतील महायुतीची सभा नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाली. या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचेही भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सात मागण्या केल्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. या मागणीवर नरेंद्र मोदी यांनी कोणतेही भाष्य केले नाही मात्र इंडिया आघाडीच्या वतीने अर्थात काँग्रेस कडून आमच्या हाती सत्ता आली तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे इकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचा :

MS धोनीमुळे हरली CSK? ‘या’ मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची ‎कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी

इचलकरंजीतील प्लेटींग कारखान्याला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान