महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याआधी आता माजी मुख्यमंत्री(Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आणि भाजपचे सूत जुळताना दिसत आहेत. अर्थात या घडामोडी खरंच युतीपर्यंत पोहोचतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण युतीच्या चर्चांना उधाण आणणारी घटना नुकतीच घडली.

भाजपचे नेते पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील हे अचानक समोरासमोर आले. यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मग युती कधी? अशी गुगली टाकली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी हजरजबाबीपणे मी या सुवर्णक्षणांची वाट पाहतोय, असं उत्तर देवून टाकलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यानंतर खासदार संजय रााऊत यांना आजच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी युतीच्या घडामोडींना पुरक ठरतील, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गट यांच्या युतीच्या सुवर्णक्षणांची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
“चंद्रकांत पाटील हे आमच्या सर्वांचे मित्र आहेत. ते पहिल्यापासून शिवसेना आणि भाजप युतीचे समर्थक राहिलेले आहेत. हे मला माहिती आहे. विशेषत: शिवसेना-भाजप युतीची जी जुनी पिढी होती, ज्यांनी एकत्र काम केलं आहे, त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते आहेत. कदाचित आताचे भाजपात बाहेरुन जे हौशे नौशे गौशे आलेले आहेत, त्यांना आमच्या 25 वर्षाच्या युतीचे महत्त्व कळणार नाही. आता जे आले आहेत त्यांचा ना भाजपशी संबंध आहे, ना हिंदुत्वासी संबंध आहे.
पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या त्या पक्षातील अनेकांच्या भावना आहेत. कारण आम्ही 25 वर्षे एकत्रपणे अत्यंत उत्तमपणे काम केलं आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकत्र काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दिल्लीत उदय झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप युतीत वितुष्ट आलं. हे दुर्दैवाने सांगावसं वाटत आहे. चंद्रकांत पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
“आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा आमचा दावा आणि हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदे यांना दिला. नंतर पक्ष फुटल्यावरही त्या सरकारमध्ये बनावट शिवसेना आहे. बनावट शिवसेना आहे, पण आहे. आमची त्यावेळी जी मागणी होती तेव्हा अमित शाह यांनी ती मागणी नाकारली. मला असं वाटत नाही की, अन्य कुणी त्यामध्ये असतील.
अमित शाहांनी ठरवून मागणी नाकारली. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती. त्यांचे आर्थिक हितसंबंध या मुंबईत गुंतले होते. म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडून संपवायची होती. ते आजही एकनाथ शिंदे यांचा वापर त्यासाठीच करत आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
“चंद्रकांत पाटील यांच्याप्रमाणे अनेकांच्या त्या पक्षात तशा भावना आहेत. तुम्हाला योग्य वेळी उत्तर मिळेल. आमच्या बैठकांमध्ये युतीबाबत चर्चा नाहीत. पण पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना असल्याने आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
“एकनाथ शिंदे यांचा गड भाजपसोबत किती काळ राहील किंवा किती वेळ टिकवला जाईल? याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. त्यांचा गट हा शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल. त्यांचा गट पूर्णपणे विस्कळीत होईल. ते आज सत्ता आणि पैसा या जोरावर एकत्र आहेत. बाकी त्यांच्याकडे काही नाही”, असं परखड मत संजय राऊत यांनी मांडलं.
हेही वाचा :
जर तुम्हाला अशी स्वप्न पडत असतील तर समजून जा, तुमचे लग्नाचे स्वप्न लवकर होईल पूर्ण
धक्कादायक ! २३ वर्षीय रशियन तरुणीसोबत भररस्त्यात भयंकर प्रकार…
…जर कोणी खंडणी मागितली तर ; बीडच्या पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम