मुलं शाळेत अन् शिक्षक बदलीसाठी कोल्हापुरात

 जिल्हा परिषदेतील शिक्षक बदलीचा कार्यक्रम शाळा(school) सुरू झाल्यानंतर ठेवण्यात आल्यामुळे शाळा सुरू होऊन अद्याप आठवडाही झाला नसेल, तोपर्यंत मुलं शाळेत आणि शिक्षक कोल्हापुरात अशी अवस्था गुरुवारी जिल्हा परिषद शाळांची झाली.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांचा चालणारा घोळ हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषद शिक्षक बदली आणि भरतीचेदेखील अधिकार काढून घेतले. शिक्षक बदलीची प्रक्रिया बदलली आणि ती ऑनलाईन केली. यामध्ये शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत होता. यावेळी शासनाने शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आणि विनंती बदली करण्याचे अधिकारी जिल्हा परिषदेला दिले. त्यामुळे विनंती बदलीची प्रक्रिया ऑफलाईन घेण्यात आली.

शासनाच्या नियमानुसार दि. 31 मेपूर्वी बदल्या कराव्यात, अशा सूचना असतात व शिक्षकांच्या बदल्या शक्यतो शाळा सुरू होण्यापूर्वी कराव्यात, असे संकेत असतात; परंतु कोरोनामुळे दोन वर्षे बदल्याच झाल्या नव्हत्या. त्यानंतर दोन वर्षांतही बदल्या झाल्या नव्हत्या. या वर्षी विनंती बदलीची प्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिली; परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे त्यामध्ये अडथळे आले. सहा महिन्यांपूर्वी नव्याने शिक्षक भरती करण्यात आली होती. त्यांना पदस्थापना देण्यात येणार होती; परंतु त्यांना पदस्थापना दिली तर सोयीच्या शाळांची संख्या कमी होईल म्हणून शिक्षक संघटनांनी प्रथम बदल्यांचा आग्रह धरला. त्यामुळे नवीन शिक्षकांना अगोदर नियुक्त्या द्यायच्या की अगोदर शिक्षकांच्या बदल्या करायच्या, या संभ्रमात जिल्हा परिषद प्रशाासन होते.

लोकसभेचे मतदान झाल्यानंतर बदलीची प्रक्रिया राबवावी म्हणून शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण व्हावी, हाच त्यामागे उद्देश होता; परंतु लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे शिक्षकांचे निवेदन निवडणूक आयोगाकडे पाठवले. निवडणुकीचा निकाल लागला, तरीही त्यावर काही झाले नाही. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच जिल्हा परिषदेने शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू केली.

दरम्यानच्या काळात आठ दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेने शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे मुलं शाळेत आणि बदलीसाठी शिक्षक कोल्हापुरात, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती.

हेही वाचा :

26 दिवसांचा पायी प्रवास, 4 ठिकाणी रिंगण सोहळा ,नामदेव महाराजांची पालखी 26 जूनला पंढरपूरकडे निघणार

‘नीट’वरून राहुल गांधीं यांच्यावर टीकास्त्र

निवडणूक आयोगाला ८ मतदारसंघांतून अर्ज