कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कारागृहात एक अलार्म सिस्टीम ब्रिटिश (administration)काळापासून आहे. कैद्यांच्या भाषेत त्याला “आलाराम”म्हटले जाते. वर्षातून किंवा सहा महिन्यातून केव्हातरी रात्री आणि अपरात्री हा अलार्म अचानक वाजू लागतो. कच्च्या आणि पक्क्या कैद्यांना काही समजायच्या आत प्रत्येक सेल मध्ये (बरॅक) कारागृहाचे सुरक्षा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आरडा ओरड करत घुसतात. सेल मधील सर्व कच्च्या आणि पक्क्या कैद्यांना एकत्र एका बाजूला उभे करून आत मधील झाडाझडती सुरू केली जाते. या झाडाझडतीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू सापडली तर संबंधिताची धुलाई केली जाते.

त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाते. कैद्यांमध्ये(administration) कारागृह प्रशासनाची दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे अलार्म वाजवला जातो. कळंबा मध्यवर्ती कारागृहात “अलार्म”सारखी उपाययोजना किंवा अचानक ची झाडाझडती प्रभावीपणे होत नसावी, आणि म्हणूनच ढीगभर मोबाईल, चार्जर, बॅटरीज, गांजा सारखे अंमल्ली पदार्थ सापडू लागले आहेत.

गेल्याच महिन्यात याच कारागृहात 50 पेक्षा अधिक मोबाईल सापडल्यानंतर त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली. चौकशीनंतर तुरुंग अधिकारी व सुरक्षा कर्मचारी अशा एकूण 11 जणांना कारागृहाच्या सेवेतून कायमस्वरूपी कमी करण्यात आले. इतकी कठोर कारवाई झाल्यानंतर कळंबा मध्यवर्ती कारागृहात आता सारे काही आलबेल असेल, असे वाटत असतानाच पुन्हा वीस ते पंचवीस मोबाईल, ढीगभर चार्जर आणि बॅटरीज सापडल्या आहेत. नोकरीतून बडतर्फ करणे, यासारखी कठोरातील कठोर उपाय योजना करुनही पुन्हा” येरे माझ्या मागल्या”असे घडत असेल तर ती अतिशय गंभीर बाब समजली पाहिजे. त्यातून कारागृहाचे अख्खे प्रशासनच संशयाच्या भोवऱ्यात येते.

जिल्ह्याच्या न्यायाधीशांना, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना, कारागृहाला अचानक भेट देऊन पाहणी करण्याचे अधिकार असतात. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वरिष्ठांच्या परवानगीने कारागृहात रात्री रात्री पोलीस फौज फाटा घेऊन धाड मारू शकतात. आर के पद्मनाभन हे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहावर अशाच प्रकारे अचानक धाड टाकून कारागृहातील सर्व सेलची झाडाझडती घेतली होती.

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला राज्याचे व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून शासनाकडून नियुक्त केले जाते. काही वर्षांपूर्वी श्री. तलवार नामक राज्याचे व्हिजिलांस ऑफिसर होते. त्यांना राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये अचानक भेट देऊन पाहणे करण्याचे अधिकार असतात. हे अधिकारी राज्यातील कोणत्याही कारागृहावर अचानक धाड टाकू शकतात.अशा प्रकारची एक व्यवस्था प्रस्थापित असते. पण गेल्या काही वर्षात अशी व्यवस्था सक्रिय असल्याचे दिसून येत नाही.

ज्यांच्याकडे मोबाईल सापडले त्या कैद्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.संबंधित कच्च्या किंवा पक्क्या कैद्याने त्याने अवैधरित्या कारागृहात आणलेल्या मोबाईल वरून कोणाकोणाशी संपर्क साधला याचा तपास संबंधितांनी केला आहे काय? याबद्दल शंका येते. कारण तपासाच्या नावाखाली पोलिसांना मोबाईल्सचा सी.डी.आर. काढण्याचे अधिकार आहेत.

संबंधितांनी कारागृहातून ज्यांच्याशी संवाद साधला, त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे पण अशा प्रकारची कारवाई पोलिसांच्या कडून झाल्याचे ऐकिवात नाही. कारागृह प्रशासनाने ठरवले तर साधी सुई सुद्धा आत मध्ये आणली जाऊ शकत नाही. तथापि ज्याअर्थी मोठ्या संख्येने मोबाईल सापडतात त्याअर्थी कारागृहाच्या प्रशासनातच गंभीर समजल्या जाव्यात इतक्या त्रुटी आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात सी.सी. टीव्ही कॅमेरे आहेत. त्याप्रमाणे कारागृहाच्या आतील भागात”जॅमर सिस्टीम”लावता येणे शक्य आहे.

या कारागृहातील अधिकाऱ्यांसह 11 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्यानंतरही पुन्हा मोठ्या संख्येने मोबाईल सापडत असतील तर इथले प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे असे म्हणावे लागेल. यासंदर्भात राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होऊनही, संबंधित कैद्याला हे मोबाईल कोणी आणि कसे पाठवले याचा तपास झालेला दिसत नाही. आत मध्ये मोबाईल संच पाठवणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई होऊ शकते असा एक संदेश पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेपर्यंत गेला तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो.

हेही वाचा :

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अत्यंत क्रूरपणे मारहाण Video

राहुल गांधींनी मोदींसोबत जाहीर चर्चेचं आव्हान स्विकारलं!

शिवसेना पक्ष अन् चिन्ह पुन्हा मिळणार? ‘रोखठोक’ मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान!