नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकारणाचा(political), राजकीय नेत्यांचा डी. एन. ए. हा सतत बदलत असतो. महाराष्ट्रात तो प्रकर्षाने जाणवतो. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते हे “गुप्त मित्र”असतात आणि कार्यकर्ते हे”उघड शत्रू”असतात. असे समजले जाते, मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर या दोन्ही बाबी एक वास्तव म्हणूनच ठळकपणे पुढे येतात. नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत पहिल्यांदाच काही खुलासे केल्याने राजकीय समीक्षक गोंधळून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून त्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ लावला जातो आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असतानाही आम्ही महाराष्ट्रात(political) शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले. ही आमच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना दिलेली मानवंदनाच आहे. त्यांच्या प्रति व्यक्त केलेला आदरच आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ते शिंदे यांच्याकडे असलेली शिवसेना हीच बाळासाहेब यांची असली शिवसेना आहे असे ते मानतात. म्हणूनच निवडणूक प्रचारात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केलेल्या जाहीर भाषणात नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख केलेला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रात आरोप आणि प्रत्यारोप, खुलासे आणि प्रती खुलासे, आणि गौप्यस्फोटाची मालिका सुरू झाली. उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा एक सामना रंगू लागला आणि रंगतो आहे. या सामन्यात दोन्ही बाजूंनी वापरलेली भाषा फार सभ्य होती असे कोणी म्हणणार नाही. दोघांनीही परस्परांना शेलकी विशेषणे लावलेली आहेत. अर्थात त्याला कारण ही तसेच होते आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडल्याचे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडलेले दिसतात तर तितक्याच त्वेषाने देवेंद्र फडणवीस हेही या दोघांवर बोलताना कसलीच कसूर ठेवत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील अनेक शहरात दौरे झाले आणि जाहीर सभा झाल्या. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही. मात्र शरद पवार यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना असाच त्यांनी उल्लेख केलेला आहे. व्यक्तिशः उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका टिपणी केलेली नाही.

मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आपल्या हृदयात एक हळवा कोपरा असल्याचे सुचित केले आहे. उद्धव ठाकरे हे आजारी होते तेव्हा मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना दूरध्वनी वरून संपर्क साधून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती विषयी चौकशी केली होती. असा खुलासा त्यांनी पहिल्यांदाच केला आहे. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्या दृष्टीने मी त्यांच्याकडे कधी पाहतही नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत. बाळासाहेबांना मी काही वेळा भेटलो होतो. त्यांनी मला मार्गदर्शन केले होते आणि आशीर्वादही दिले होते. त्यांच्यासारखा नेता होणे नाही अशा शब्दात मोदी यांनी केलेला बाळासाहेबांचा गौरव हा सुद्धा पहिल्यांदाच मुलाखतीच्या माध्यमातून पुढे आलेला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विषयी माझ्या मनात प्रेम भावना(political) आहे. ते जेव्हा केव्हा अडचणीत येतील किंवा अडचणीत आले तर त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा मी पहिला असेन. असेही त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या विषयी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या भावना, सध्याच्या राजकारणात कोणालाही गोंधळात टाकतील अशाच आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विषयीचे मत आणि भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्यानंतर राजकीय विश्लेषक त्याचा नेमका अर्थ शोधू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक खिडकी उघडून ठेवली आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रात 21 ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे. या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळेल. त्यांना किमान दोन अंकी जागांवर विजय मिळाला तर, त्यांना एन डी ए कडे आणता येईल. त्यासाठी आत्ताच साखर पेरणी केलेली चांगली हा सुद्धा त्यामागे एक राजकीय हेतू असू शकतो. उद्धव ठाकरे यांची द्विधा मनस्थिती निर्माण करायची. त्यांची पाऊले पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे वळतील असे वातावरण तयार करायचे. तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमचा यथोचित सन्मान करू. असे नरेंद्र मोदी यांच्या मुलाखती मधून सुचित होते.

याशिवाय ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे(political) यांच्या विषयी किती हळवे आहेत असा एक संदेश पाठवण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही. नकली शिवसेना हा त्यांनी केलेला उल्लेख हा अपवाद असावा. त्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांच्या ठाकरी शैलीचा पुरेपूर वापर केला आहे. शिवसेना फोडण्यामागे नरेंद्र मोदी यांचाच पुढाकार आहे. त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय देवेंद्र फडणवीस पक्ष फोडण्याचा उद्योग करणार नाहीत. असे स्पष्ट मत त्यांचे झालेले आहे. म्हणूनच ते एकाच वेळी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या वर हल्लाबोल करताना दिसतात. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी काही खुलासे पहिल्यांदाच केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना.

राजकारणाच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी असू शकतात. राजकारण वेगळे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला होता असे त्यांनी म्हटले आहे. राजकारण वेगळे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे याचा अर्थ एका क्षणी राजकारण संपल्यानंतर आम्ही एकमेकांचे मित्रच असतो असे त्यांना म्हणावयाचे आहे. पण कार्यकर्त्यांचे काय? त्यांची डोकी फुटतात त्याचे काय? याचे उत्तर माहित असूनही ते देणार नाहीत. कारण राजकीय नेते हे गुप्त मित्र असतात आणि कार्यकर्ते हे उघड शत्रू असतात. हेच वास्तव त्यांच्या उत्तरातून पुढे येते आहे.

हेही वाचा :

‘या’ कारणांसाठी बच्चू कडूंनी दिला राजू शेट्टींना पाठिंबा

सांगलीच्या उमेदवाराबाबत प्रकाश आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांचा धक्का

हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?