उम्मीद पर ‘आरसीबी’ कायम है! सहा पराभवानंतर चाखली विजयाची चव

हे फक्त आरसीबी (rcb)अन् त्याचे चाहतेच सहन करू शकतात. आयपीएलच्या 17 व्या हंगामात आरसीबीनं सलग सहा पराभव पाहिले.आता वाटू लागलं होतं की विराटच्या डोक्यावर ऑरेंज कॅप असेल मात्र माथ्यावर विजयी तिलक काही लागणार नाही.

मात्र आरसीबीच्या (rcb)बॉलर्सनी कधी नव्हे ते मनावर घेतलं अन् हंगामातील सर्वात तगडी बॅटिंग लाईन अप असलेल्या हैदराबादची अवस्था 6 बाद 84 धावा अशी करून टाकली. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स अन् शाहबाज अहमदनं झुंज देण्याचं ठरवलं नसतं तर हैदराबादचा मोठा पराभव अटळ होता.

आरसीबीनं तब्बल सहा पराभव पचवल्यानंतर विजयाची चव चाखली आहे. तांत्रिकदृष्ट्या का असेना आरसीबीचे प्ले ऑफचे चान्सेस अजून जिवंत आहेत. बाकी हा विजय म्हणजे ताठ मानेनं जगता यावं यासाठी महत्वाचा!
आजच्या सामन्यात चेस मास्टर आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिथं खेळपट्टी नंतर फलंदाजीला साथ देणार नाही हे सिद्ध झालं होतं. आरसीबीनं तावातावानं सुरूवात केली खरी मात्र 4 षटकात 50 धावा केल्यानंतर हैदराबादनं त्यांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली.

ड्युप्लेसिस अन् जॅक विल बाद झाल्यानंतर रजत पाटीदारनं आपला दांडपट्टा जोरात फिरवला अन् 19 चेंडूत 50 धावा वसूल केल्या. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीचं आपलं नेहमीचाच अँकर इनिंगचा खेळ सुरू होता. तो आपल्या गतीनं धावा करत होता. संघाला 13 व्या षटकात 130 धावांवर पोहचवल्यानंतर पाटीदारनं मैदान सोडलं.

त्यानंतर संथ विराट अन् नुकताच आलेल्या कॅमरून ग्रीननं 15 व्या षटकापर्यंत संघाच्या धावसंख्येत 10 धावांचीच भर घातली. त्यानंतर विराटनं 43 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी करत ग्रीनची साथ सोडली. लोमरोर पुन्हा फेल गेला. त्यानंतर आरसीबीची शान दिनेश कार्तिक अन् ग्रीननं आरसीबीला फास्ट ट्रॅकवर नेलं.

बघता बघता इनिंगचं शेवटचं षटक आलं होतं. अन् आरसीबीनं 190 धावा पार केल्या होत्या. यात ग्रीनच्या फटकेबाजीचा मोठा वाटा होता. दिनेश शेवटचे षटक सुरू होण्यापूर्वीच बाद झाला. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या स्वप्निल सिंहनं 6 चेंडूत 12 धावा ठोकत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. विराटच्या संथ खेळण्यामुळं आरसीबी अडचणीत तर येणार नाही ना अशी भीती वाटत होती.
मात्र आरसीबीच्या पोरांनी असा काही मारा केला की हैदराबादचे रथी महारथी फज्जाला पाय लावून माघारी परतू लागली. अपवाद मात्र अभिषेक शर्माचा होता. त्यानं 13 चेंडूत 31 धावा ठोकत आपलं काम चोख पार पाडलं. दुसरीकडं हेड 1, मार्करम अन् क्लासेन 7 धावा करून माघारी परतले.

हेही वाचा :

अजित पवारांच्या येण्याने शिंदे गटाला फटका; तीन ते चार जागांवर नुकसान

खासदार दाजीबा देसाई आणि देशातील निच्चांकी मताधिक्य

भाजपच्या इच्छुक उमेदवाराने दिली ठाकरे गटाच्या नवरात्रोत्सवाला भेट; राजकीय चर्चांना उधाण