खरं कोण बोलतंय? फडणवीस की ठाकरे?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये(politics) आमच्याशी युती केली होती, पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांनी छुपी युती केली होती. त्यांच्याशी अलिखित करार केला होता असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलतात असे उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे या दोघांपैकी खरे कोण बोलतय? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पद(politics) शिवसेनेला द्यायचे असे ठरलेले नव्हते. सत्तेचे समान वाटप करायचे ठरले होते. तुम्हाला मुख्यमंत्री पद देता येणार नाही हे मी त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितल्यानंतर मग मी”यु टर्न”घेतो असे ठाकरे म्हणाले होते. पण अशा प्रकारचा यू टर्न घेताना शिवसैनिकांना सत्तेत मोठा वाटा मिळतो आहे असे वाटले पाहिजे अशी सूचना मी त्यांना केली होती. असे देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांना भाजप बरोबर यायचेच नव्हते. त्यांनी निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याशी संधान बांधले होते. त्यांच्याशी छुपी युती केली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागा भाजप पेक्षाही जास्त याव्यात अशी रणनीती या दोघांनी आखली होती. भारतीय जनता पक्षापेक्षा जादा जागा शिवसेनेच्या आल्या तर शिवसेनेचा मुख्यमंत्री असे या दोघांमध्ये ठरले होते असा गौप्य स्फोट फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री पद देऊ हा दिलेला शब्द पाळला असता तर भारतीय जनता पक्षाला आत्ताचे पक्ष फोडीचे प्रयास करायला लागले नसते. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपच्या अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांच्या खोलीमध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा शब्द दिला होता हे त्यांनी यापूर्वी वारंवार सांगितलेले आहे. आताही तेच तेच सांगत आहेत. त्यामुळे फडणवीस खरे बोलतात की ठाकरे खरे बोलतात असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. आणि या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अद्यापही मिळताना दिसत नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंची छुपी युती झालेली होती असा खळबळजनक दावा केला आहे आणि त्याबद्दल ठाकरे यांच्याकडून समाधानकारक खुलासा झालेला नाही. भाजप बरोबर 2019 मध्ये शिवसेनेने केलेली युती ही फसवी होती. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणारी होती, कारण त्या आधीच त्यांनी शरद पवार यांच्याशी युती केली होती. हा नवीनच मुद्दा फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून मांडलेला आहे.

फडणवीस यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधी बद्दल उशिरा का होईना पण गौप्य स्फोट केले होते. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील छुप्या युती विषयी गौप्यस्फोट करता आला असता. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुक प्रचाराचा मुहूर्त का साधला? पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचे ठरले होते असे उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेकदा शपथेवर सांगितलेले असताना, त्याचा खुलासा इतक्या विलंबाने का केला? हा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे. राजकारणात “टायमिंग”साधण्यासाठी एकेक विषय पुढे आणायचा. ही भारतीय जनता पक्षाची रणनीती असावी.

मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने विशेषता अमित शहा यांनी पाळला नाही हा उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार उपस्थित केला जाणारा संवेदनशील विषय, आणि त्यावरील चर्चा बाजूला पडावी या हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी आता ठाकरे यांच्यावर शरद पवार यांच्याशी त्यांनी आधीच युती केली होती असा नवीन खळबळ जनक विषय पुढे आणलेला दिसतो.

पहाटेच्या शपथविधीचे भूत अधून मधून बाटलीतून बाहेर येते किंवा ते मुद्दाम बाहेर काढले जाते अगदी त्याचप्रमाणे शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा भाजपने दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार चर्चेत आणायला जातो. पण नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? उद्धव ठाकरे यांच्यावर की देवेंद्र फडणवीस यांच्यावर?

हेही वाचा :

माझी वाट लागलीये प्लीज…, हात जोडून रोहित शर्माने कोणाला केली विनंती?

कोल्हापूर जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरवात

मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद