वंदे मातरम् ला मिळतोय आता राष्ट्रगीताचा दर्जा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

स्वातंत्र्य पूर्वकाळात स्वातंत्र्य चळवळीचा”मंत्र” बनलेल्या वंदे मातरम् या गीताला आता रितसर राष्ट्र गीताचा दर्जा मिळणार आहे. राज्यसभेत या संदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे आणि आता ते लोकसभेत मांडले जाईल. त्यामुळे नजीकच्या काळात वंदे मातरम् ला सन्मानाच्या चौकटीत आणि कायद्याच्या कक्षेत आणले जाईल. वंदे मातरम् चा अवमान आता दखलपात्र गुन्हा समजला जाईल. बंकिमचंद्र चतर्जी यांनी इसवी सन 1870 च्या दशकात हे प्रेरणा गीत लिहिले आणि इसवी सन 1882 च्या “आनंद मठ” या कादंबरीत ते समाविष्ट करण्यात आले. संस्कृत आणि बंगाली मिश्रित भाषेत हे प्रेरणा गीत लिहिले गेले आहे. इसवी सन 1896 मध्ये कोलकाता येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते त्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम हे गीत सादर केले होते. दिनांक 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरम् ला संविधान सभेने राष्ट्रगीताचा दर्जा दिला होता.

इसवी सन 1905 मध्ये ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली तेव्हा वंदे मातरम् ही घोषणा बनली होती. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात हे गीत राष्ट्राचा हुंकार बनले होते. स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र बनले होते. (Vande Mataram) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वंदे मातरम् ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला तथापि या गीताला कायद्याच्या चौकटीत आणले गेले नव्हते. पण तरीही ते सर्व प्रकारच्या कार्यक्रमात प्राधान्याने राष्ट्रगीत म्हणून गायले जात होते. आता 21व्या शतकात या गीताला सन्मानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत आणले गेल्यामुळे त्याचा अवमान हा दखलपात्र गुन्हा समजला जाणार आहे. “इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा”या घोषणेशी , केंद्र शासनाच्या या निर्णयाचा संबंध जोडला जाऊ नये. कारण वंदे मातरम् ला राष्ट्रगीताचा दर्जा देणे हे कुठल्या एखाद्या समुदायाला डिवचले आहे असे म्हणता येणार नाही.

हा देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी इसवी सन 857 मध्ये पहिला उठाव झाला. तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई कोल्हापूरचे छत्रपती चिमा साहेब आदींनी हा उठाव केला होता. त्यानंतर विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला. या लढ्यात जसे हिंदू होते तसेच मुस्लिम, पारसी, शीख धर्मीय सहभागी होते. त्या लढ्यात वंदे मातरम् हे घोषवाक्य स्वातंत्र्याचा मंत्र बनले होते. सर्वच धर्मीय हे घोषवाक्य वापरत होते. तेव्हा मुस्लिम धर्मीयांनी या घोषवाक्याला कोणत्याही प्रकारचा विरोध केला नव्हता. मुस्लिम बांधव मोठ्या जोशाने हे घोषवाक्य बोलत होते. वंदे मातरम् म्हणण्यात त्यांना कोणतीही धार्मिक अडचण नव्हती.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात कार्यक्रम संपल्यानंतर वंदे मातरम् म्हटले जायचे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमानंतर संपूर्ण वंदे मातरम् म्हटले जायचे. संपूर्ण वंदे मातरम् ही भाजपची खासियत बनली होती. संपूर्ण वंदे मातरम् बहुतांशी लोकांना म्हणता येत नाही किंवा ते जन गण मन सारखे मुखोद्गतही नाही.विसाव्या शतकाच्या आठव्या दशकात या देशात हिंदू मताचे ध्रुवीकरण झाले किंवा ते आताही होते आहे पण त्यासाठी”इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा”ही टॅग लाईन बनवली गेली आणि (Vande Mataram) त्यातून वंदे मातरम् ला मुस्लिम धर्मियांकडून विरोध होऊ लागला. वंदे मातरम म्हणण्याची सक्ती करता येणार नाही. आम्ही ते म्हणणारे नाही. अशी उघड उघड भूमिका घेतली जाऊ लागली. एम आय एम सारखे राजकीय पक्ष त्यासाठी पुढे आले.

वंदे मातरम ला राष्ट्रीय गीत म्हणून एका खास विधेयकाच्या माध्यमातून सन्मानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत आणले गेल्यानंतर या गीताला राष्ट्रगीत म्हणून प्रत्येक भारतीयाला स्वीकारावेच लागेल. या राष्ट्रगीताचा अवमान कोणालाही करता येणार नाही. (Vande Mataram) आणि तसा प्रयत्न झालाच तर दखलपात्र गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याला कमाल तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा होईल अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे आणि आता ते मंजुरीसाठी लोकसभेला जाईल तेथे मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे विधेयक राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर हा नवा कायदा देशभर लागू होईल.

हेही वाचा :

कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी खून?

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?

अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?