भू खंडाचे श्रीखंड जाहले! धन्य झाले सकळ जन !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बृहन मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी पगार लाखात(people) घेतात, पण त्यांना समज ती कसलीच नाही. समज असतील तर गैरसमज करून घेऊन विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतलीच नसती. महापालिकेच्या 500 कोटी रुपये किमतीच्या जागेवर जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बांधले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता. ठाकरे गटातून शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला, त्यानंतर ते खासदार झाले आणि रवींद्र वायकर यांच्यावर गैर समजूतीने महापालिकेचा भूखंड ढापल्याचा” एफ आय आर” दाखल केल्याचा साक्षात्कार महापालिका प्रशासनाला झाला. वाईटातून चांगलेच घडते असे म्हणतात. म्हणूनच भूखंडाचे श्रीखंड जाहले, अवघे धन्य झाले सकळ जन!

रवींद्र वायकर हे ठाकरे गटाच्या शिवसेनेत होते(people). जोगेश्वरी येथे महापालिकेच्या भूखंडावर त्यांनी पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता. महापालिका प्रशासनाला त्यांनी त्याबद्दल धारेवर धरले होते. महापालिका प्रशासनाने मग वायकर यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेत एफ आय आर दाखल केला. सोमय्या यांनी आता या हॉटेलवर हातोडा पडणार आहे असे मीडियासमोर येऊन सांगायला वारंवार सुरुवात केली. मग अचानक वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. आपणाला योग्य न्याय मुख्यमंत्री शिंदे हेच देऊ शकतात हा त्यांना ठाम विश्वास होता. आणि त्यांचा हा विश्वास सार्थ ठरला. आधी त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. थोडक्या मताने काय होईना ते खासदार झाले.

रवींद्र वायकर हे खासदार होऊन महिना सव्वा महिना झाला आणि बृहन मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आली. आपण भल्या माणसावर अन्याय करत आहोत याची जाणीव झाल्यावर त्यांनी न्यायालयात रवींद्र वायकर यांच्या विरुद्ध गैरसमजुतीतून एफ आय आर दाखल केला असल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाच्या या समजदारीबद्दल कौतुकच केले पाहिजे. गैरसमज दूर झाला नसता तर एका समाजसेवकावर, एका लोकप्रतिनिधीवर केवढा मोठा घोर अन्याय झाला असता. वायकर यांच्या बेकायदा हॉटेलवर हातोडा हाणायला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या पायावरच हा हातोडा आता बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील आज सर्वात दुःखी कोण असेल तर ते किरीट सोमय्या होत.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या कोकणातील हॉटेल रिसॉर्ट चा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला. पण रिसॉर्टची एक वीटही निघालेली नाही. हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यावर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोठ्या गाजावाजा करून त्यांनी चाल केली होती. शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला होता. मुश्रीफ आता येत्या काही दिवसात जेलमध्ये जातील असे ते सांगत सुटले होते. पण हेच मुश्रीफ महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत, यांच्यानंतर ऑर्थर रोड जेलमध्ये कोणकोण जाणार याची त्यांनी एक यादीच जाहीर केली होती.

रवींद्र वायकर यांना किरीट सोमय्या यांनी रडारवर घेतले होते. त्यामुळे महापालिका(people) प्रशासनाचा गैरसमज झाला होता. आता हा गैरसमज वेळीच दूर झाला नसता तर वायकर यांच्यावर अन्याय झाला असता. वायकर यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा राजकीय शहाणपणा दाखवला नसता तर ते खासदार झाले नसते आणि त्यांचे हॉटेल अडचणीत आले असते.

रवींद्र वायकर यांना अशी क्लीन चीट मिळाल्यानंतर सामान्य माणसाला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.
अजितदादा पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, भावना गवळी, प्रतापराव सरनाईक, यशवंत जाधव वगैरेंच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाले पण त्यांना क्लीन चीट मिळाली. त्यामुळेच वायकर सुटले म्हणून कोणालाही आश्चर्य वाटले नाही. कधीतरी ते घडणारच होते.

रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्यावर बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप झाला होता. तेव्हा संजय राऊत यांनी या आरोपा विरुद्ध वायकर यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली होती. आता हेच संजय राऊत वायकर यांना क्लीन इस्टेट मिळाल्यानंतर, एक दिवस दाऊद इब्राहिम ला सुद्धा या सरकारकडून क्लीनचीट मिळेल अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

गैरसमजुतीतून वायकर यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे एफ आय आर दाखल करणाऱ्या संबंधित महापालिका अधिकाऱ्याविरुद्ध आता खरे तर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे. पण तसे होईल असे दिसत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून रवींद्र वायकर प्रकरण प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल.

हेही वाचा :

T20 WC विजयानंतर आता कुलदीप यादवची लगीन घाई?

मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगित

झटपट नाश्त्यासाठी ‘मसाला मखाना’, ही आहे सोपी रेसिपी