प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू (political issue)यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. गेल्या सात दिवसांपासून एक कणही अन्न न घेतल्याने त्यांची प्रकृती खालावली असून, दोन दिवसांपूर्वी उलट्यांमुळे त्यांची तब्येत अधिकच बिघडली. तिवसा ग्रामीण रुग्णालयाने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्याचा सल्ला दिला असून, “उपचार न झाल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे,” असा गंभीर इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आंदोलनस्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, संपूर्ण परिसर पोलीस छावणीत बदलला आहे. त्यातच कडू यांनी अजूनही अन्न घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर उपचाराची अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय (political issue)आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आज मंत्री उदय सामंत आणि पंकजा मुंडे बच्चू कडू यांच्या भेटीला जाणार आहेत. काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. मात्र, कडू आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आहेत. आज दुपारी प्रहार संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील भूमिका निश्चित केली जाणार असल्याने राज्याचे लक्ष त्या बैठकीकडे लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक समिती गठीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी जाहीर केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. तरीही कडू यांच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी उद्या राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
बच्चू कडू यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या:
शेतमालाच्या किमान आधारभूत दरावर 20% अनुदान द्यावं
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपयांची मदत व पूर्ण कर्जमाफी
धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावं
धनगर समाजातील बेरोजगारांना 13% नोकरी आरक्षण
दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा 6000 रुपये मानधन
ग्रामीण घरकुल योजनांसाठी किमान 5 लाख रुपयांचे अनुदान
कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाने आता व्यापक स्वरूप धारण केलं असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजातील विविध घटक सरकारवर दबाव टाकत आहेत. सरकारकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून, नागरिकांमध्येही या मुद्द्यावरून संताप वाढत आहे.
हेही वाचा :