आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी(political campaign) सुरू आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे शाहू महाराजांना शह देण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं विधान त्यांनी केलं.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांची कोल्हापुरच्या चंदगड(political campaign) तालुक्यातील नेसरी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

“या मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो. यानिमित्ताने सांगितले पाहिजे की आत्ताचे महाराज साहेब आहेत हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत.त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार,” असे संजय मंडलिक यावेळी म्हणाले.

तसेच “माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी विचार जपला. ही शाहू महाराजांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार दिला. इथे राहणारा प्रत्येक माणूस शाहू विचार घेऊन जगतो,” असेही संजय मंडलिक म्हणाले. दरम्यान, त्यांंच्या या वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात पिस्तुलचा धाक दाखवून दरोडा

राष्ट्रवादीत त्या नेत्याला प्रवेश देणे ही मोठी चूकच… शरद पवारांची कबुली

वसुलीचा अजब प्रकार, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी Loan Appने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो