ज्येष्ठ राजकारण्यांची सटकली! गुंडांची भाषा तोंडात अडकली!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पॉलिटिकल आयडियालॉजी वैचारिक बैठक, विचारांची लढाई, पक्षीय निष्ठा, तात्विक अधिष्ठान हे राजकारणाची(politicians ) पोत, प्रत किंवा पत ठरवणारे शब्द महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणातून तडीपार झाले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन विरुद्ध राणे पिता-पुत्र, अमोल मिटकरी विरुद्ध लक्ष्मण हाके, यांनी एकमेकांविरुद्ध टीका करताना वापरलेले शब्द टपोरी समजल्या जाणाऱ्या तरुणांना लाजवणारे आहेत. कवटी सटकल्यासारखी, त्यांची गुंडाची भाषा ऐकल्यानंतर महाराष्ट्रात वाढलेल्या गुंडागर्दीवर त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही असे म्हणावे लागेल. आपण जे काही बोलतो, जी भाषा वापरतो त्याचा प्रतिकूल परिणाम युवा पिढीवर होऊ शकतो याचे भानही त्यांना राहिलेले दिसत नाही.

ठाकरे बंधूंनी एकत्र यावे की नको या विषयावर इतर पक्षातील मंडळींनी बोलूच नये असे नाही. त्यांनी सावधपणे बोलवले पाहिजे. संबंधितांच्या भावना दुखावतील अशी टीका टिपणी करू नये. पण कोणत्याही विषयावर, कोणत्याही नेत्यावर, कारण/ अकारण बोलण्याचा अधिकार आपणाला आहे अशा गैरसमजोतीत वावरणाऱ्या नितेश राणे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर केलेल्या तोंड पाटीलकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उत्तर दिले आणि नितेश राणे(politicians ) यांची वैचारिक उंची लवंगे इतकी असल्याचे म्हटल्याने नारायण राणे यांना त्याचा राग आला आणि त्यांनी या दोघांच्या भांडणात (त्याला भांडणच म्हटले पाहिजे) उडी घेतली. आणि आता दोघांनीही एकमेकाला आव्हान दिले आहे.

अवघे पाऊणशे वयमान असणाऱ्या प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना कोल्हापुरी पैलवानाप्रमाणे शड्डू ठोकला, दंड थोपटले आणि कणकवलीला येऊ काय? मी कुणाला घाबरत नाही असे आव्हान दिल्यानंतर वयाची पंच्याहत्तरी उलटून गेलेल्या नारायण राणे यांनी मी तुझ्या मराठवाड्यात येईल आणि तुला ओळखायला लावीन अशी सरळ सरळ धमकीच दिली आहे. आता या दोन जेष्ठ राजकारण्यांच्या(politicians ) कडून आजच्या युवा पिढीने कोणता आदर्श घ्यायचा?

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दरम्यान लक्ष्मण हाके हे नाव ओबीसींचा तरुण नेता म्हणून पुढे येऊ लागले. हाके यांनी अजित दादा पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर अमोल मिटकरी हे चांगलेच संतापले. आणि मग या दोघांमध्ये जो काही वाद झाला, त्याला वाद म्हणणे चुकीचे ठरेल. अतिशय गलिच्छ भाषेत या दोघांमध्ये मीडियाच्या कॅमेरासमोर भांडणे झाली. गल्लीतील टपोरी तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये जशी भांडणे होतात, जशी शिवीगाळ होते त्याची आठवण या दोघांनी करून दिली. माकड, गाढव, औकात, दारुड्या, बेवड्या, अशा शब्दांची घाऊक देवाण-घेवाण हाके आणि मिटकरी या दोघांनी केली.

गल्लीबोळातली टपोरी पोरे आणि यांच्यात फरक तो काय राहिला अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाही तरच नवल. रायगड जिल्ह्यात तटकरे विरुद्ध गोगावले यांच्यातील भांडण आता एकेरीवर आले आहे. दोघांच्या कडून झालेले नॅपकिन पॉलिटिक्स पाहून सर्वसामान्य जनतेला धक्काच बसला. लहान मुले एकमेकांना चिडवतात तशा पद्धतीने सुनील तटकरे आणि भरत गोगावले भांडत असल्याचे चित्र महाराष्ट्राने घरच्या छोट्या पडद्यावर पाहिले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून या दोघात सुरू असलेला वाद आता खालच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काही राजकारण्यांनी(politicians ), काही नेत्यांनी राजकारण नासवून टाकले आहे.

पूर्वी महाराष्ट्रातील राजकारणाला एक प्रकारची संस्कृती होती. आत्ताची भाषा त्या वेळच्या राजकारण्यांच्या जवळपासही फिरकत नव्हती. व्यक्तिगत चिखल फेक केली जात नव्हती. सत्ताधारी तसेच विरोधक यांनी एक प्रकारची लक्ष्मण रेषा आखून ठेवली होती. एकमेकांचा आदर राखण्याची, प्रतिष्ठा जपण्याची सभ्यता तेव्हा पाळली जात होती. व्यक्तिगत आरोप फार क्वचित केले जात असत. पण नंतर सपशेल माफीही मागितली जात असे. राजकारणावर तेव्हा पैशाचा प्रभाव नव्हता.

राजकीय वैचारिक बैठक कोणताही नेता सोडत नव्हता. गेल्या काही वर्षांपासून विशेषतः इसवी सन 2019 पासून महाराष्ट्रातील राजकीय सभ्यतेला व्यक्तिगत महत्त्वकांक्षेचे ग्रहण लागले. उन्मादी राजकारण सुरू झाले. काहीजण नेत्याचे खाजगी आयुष्य समाजासमोर आणू लागले. आपण केलेल्या आरोपामुळे संबंधित नेत्याच्या घरचे वातावरण बिघडू शकते, त्यांचा संसार उध्वस्त होऊ शकतो याचासुद्धा विचार ज्येष्ठ राजकारणीसुद्धा करताना दिसत नाहीत. एकूणच महाराष्ट्रातील समस्त राजकारण्यांनी”कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र”असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे.

हेही वाचा :