कोल्हापूर, दि. 28 मे (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा(Shivaji University) परीक्षा व मूल्यमापन विभाग सध्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल तयार असूनही अद्याप जाहीर करण्यात आले नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकले गेले आहे.

बी. कॉम तृतीय वर्षाचे निकाल १० मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र काही कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचे निकाल २८ मेपर्यंतही जाहीर करण्यात आलेले नाहीत. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कॉलेजच्या काही प्राध्यापकांनी मूल्यमापन वेळेत न केल्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरून काढणार?
निकाल तयार असूनही विद्यापीठाने(Shivaji University) ते रोखून ठेवणे ही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कृती आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून काही विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील गमवाव्या लागत आहेत. अशा स्थितीत हा विलंब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक नुकसानीस कारणीभूत ठरत आहे.
प्रशासनाचा विस्कळीत कारभार
मूल्यमापन पूर्ण होऊन निकाल तयार झाले आहेत, हे प्रशासनाच्या अंतर्गत माहितीतून स्पष्ट होत आहे. तरीही निकाल जाहीर न करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
आंदोलनाची शक्यता
या अजब कारभाराविरोधात विविध विद्यार्थी संघटना लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. “आम्ही वेळेवर परीक्षा दिली, उत्तरपत्रिका लिहिल्या, मग आमच्या निकालासाठी आम्हालाच शिक्षा का?” असा सवाल करत विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी व सर्व निकाल त्वरित जाहीर करावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
64MP कॅमेरा आणि AI फीचर्ससह स्वस्त 5G फोन लाँच
काजोल करणार राक्षसाशी सामना; ‘Maa’ चित्रपटाचा खतरनाक ट्रेलर रिलीज
अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मोठा निर्णय! धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा