मोदींचाच आत्मा वखवखलेला; शरद पवारांवरील पंतप्रधानांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार

कोल्हापूर : ‘‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देऊन हुकूमशाहांचे सरकार(political consulting firms) गाडून टाका. गुजरातमधील दोन माणसे महाराष्ट्र लुटत आहेत. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. तो या दोघांच्या हाती द्यायचा नाही. त्यांचा निवडणुकीत सुफडासाफ करा,’’ असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले.

यावेळी ‘‘महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला सहन होणार नाही,’’ असा इशारा शरदचंद्र पवार(political consulting firms) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विरोधकांना दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी येथील गांधी मैदानात आयोजित ‘शिव-शाहू निर्धार’ सभेत ते बोलत होते.

श्री. ठाकरे यांनी व्यासपीठावर येताच, ‘‘हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले, आंबेडकरांचा आहे की शहा, मोदी, अदानींचा आहे? महाराष्ट्र शहा-मोदी-अदानींच्या हातात देणार आहात का?,’’ असा सवाल करून बोलण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या इतिहास सांगणारा दिवस आहे. मुंबईतील हुतात्मा स्मारकाला वंदन केले आणि तेथील शेतकरी व कामगारांच्या मूर्तीच्या हातातील मशाल घेऊन आपण पुढे निघालो आहोत. हुतात्म्यांना वंदन करताना मी शपथ घेतली, की रक्त सांडून मिळविलेली मुंबई आम्ही महाराष्ट्र द्रोह्यांच्या हातात जाऊ देणार नाही. जे महाराष्ट्र लुटताहेत, ओरबडताहेत त्यांचा सुफडासाप केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ तुम्ही घेणार की नाही?’’

उमेदवारीवरून टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्हाला तुमचे उमेदवार मिळत नाहीत म्हणून तुम्ही आमचे चोरता आणि त्यांना उमेदवारी देता, हेच तुमचं अपयश आहे. तुम्ही चाळीस चोरले असतील; पण आज महाराष्ट्रातील लाखो नव्हे करोडो लोक माझ्यासोबत, पवारांसोबत आणि महाविकास आघाडीसोबत आहेत.’’

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘आज मुश्रीफबाबा कोठे गेले? मला आजही आठवतेय, त्यांच्या पत्नी तळमळीने सांगत होत्या, की चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागून बदनाम करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. आता आरोप करणाऱ्यांना काय लिमलेटीची गोळी दिली काय?’’

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्या मशाल गीतामधील तो एक शब्द काढायला सांगताय. वाट्टेल ते झाले तरीही तो काढणार नाही. मोदीजी ‘जय भवानी, जय शिवाजी’ हा आमचा आत्मा आहे. तुम्ही तोच मारायला निघाला आहात. शेतकऱ्यांनी तुमचे घोडे काय मारले आहे? मोदी सरकार शेतकऱ्याला सहा हजार भीक म्हणून देतो. बळी राजाला काय भिकारी समजता काय? इंडिया सरकार सत्तेवर येणारच. सरकार आल्यावर या महाराष्ट्राचे वैभव लुटणाऱ्यांना आम्ही तडीपार करणारच.’’

सतेज पाटील यांच्याकडे पाहून ठाकरे म्हणाले, ‘‘गेल्यावेळी तुमचं ठरल होतं. यावेळी काय ठरलंय? भाजप प्रवृत्ती किती खालच्या पातळीची आहे, हे येथील माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी जाहीर सांगितले आहे. विधानसभेत ताकद कमी करायची म्हणून शिवसेनेचे उमेदवार पाडले. माझ्या शिवसेनेशी, भगव्याशी गद्दारी केली, त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापुरात आलो आहे.’’

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली; मात्र मोदींचाच आत्मा वखवखलेला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातच्या भूकंपात आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शरद पवार यांना केले होते. हे त्यांचे मोठेपण होते. पक्षाच्या, राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन पवार गुजरातच्या मदतीला धावून गेले होते. याला दिलदारपणा लागतो. तो शरद पवारांकडे आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होता. भटकता आत्मा असतो, तसा एक वखवखलेलाही आत्मा आहे. हा एवढा वखवखला आहे, की तो स्वतःची तुलना शिवाजी महाराजांच्या सोबत करीत आहेत.’’

हेही वाचा :

 मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्..

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; शिंदे गटातील आमदार पुत्रावर गुन्हा दाखल