इचलकरंजी – एकीकडे श्रध्दा अकॅडमीवर(Academy) विद्यार्थ्यांच्या छळाचे आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच, दुसरीकडे या संस्थेच्या अतिक्रमण प्रकरणावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे. आप्पासाहेब तांबे यांच्या श्रध्दा अकॅडमीने इचलकरंजी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचा आरोप होत आहे.

शुक्रवारी सकाळी अचानक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या ठिकाणी धडक दिली(Academy). पथकाच्या आगमनाने परिसरात एकच खळबळ उडाली. नगरपरिषदचे अधिकारी संग्राम भोसले आणि आवळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा घेऊन आलेल्या पथकाने कारवाईचे संकेत दिले. मात्र, साऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही कारवाई प्रत्यक्षात न होता ‘२४ तासांची शॉर्ट नोटीस’ देवून पथक निघून गेलं.
या अचानक थांबलेल्या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे. कोपऱ्या-कोपऱ्यांत कुजबुज सुरू झाली – “कारवाई रोखण्यासाठी काही ‘विशेष ताकदी’नं हस्तक्षेप केला का?”, “ही नोटीस केवळ स्थगिती मिळवण्यासाठीचा प्रयत्न आहे का?”, “कोणत्या दबावाखाली पथक माघारी फिरलं?” – अशा प्रश्नांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे.
दरम्यान, समाजसेवक चंद्रकांत कोष्टी यांनी या संभाव्य ‘खेळी’चा अंदाज घेत उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण गोंधळात तांबे सर स्वतः अनुपस्थित होते. अकॅडमीतील इतर पदाधिकाऱ्यांनीही काहीही स्पष्टीकरण दिलं नाही. जमिनीचे मूळ मालक असलेले खंजिरे यांना मात्र या सगळ्या प्रकरणात अडचणीच्या स्थितीत पाहिलं गेलं.
या अतिक्रमण प्रकरणाचं सत्य काय, महानगरपालिकेची पुढची भूमिका काय असेल आणि न्यायालयीन पातळीवर काय चाललं आहे, याकडे आता साऱ्या शहरवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. “नोटीस दिली, पण कारवाई थांबली – कुणाच्या इशाऱ्यावर?” असा सवाल आता साऱ्या इचलकरंजी शहरात विचारला जात आहे!
हेही वाचा :
स्मशानातले अघोरी प्रकार काल ,आज आणि उद्या सुद्धा
निवडणूक प्रक्रियेचे सीसीटीव्ही फुटेज ४५ दिवसांत नष्ट करणार; आयोगाचा मोठा निर्णय
आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजन नाथ यांचं गैरवर्तन; भाविकांकडून कारवाईची मागणी