नागरिकांनो सावधान! पुढील 5 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सूनने जोरदार एंट्री केली असून अनेक भागांत जोरदार पावसाला(rain) सुरुवात झाली आहे. मुंबईसह रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, काही भागांत पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात भेगा पडल्याने वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. साताऱ्यातील पाटण-चिपळूण मार्गावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे तो बंद करण्यात आला आहे.

मराठवाडा, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता :
फक्त कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रातही मुसळधार पावसाचा(rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, वाहनचालक आणि सामान्य नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. नेहमीच्या सरासरी वेळेप्रमाणेच यंदा १७ जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्र व्यापून गेला आहे. यासोबतच गुजरात, झारखंड आणि बिहारपर्यंतही मान्सूनने मजल मारली आहे.

मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस; जनजीवनावर परिणाम :
१७ जून सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरात ८३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे (७३.७ मिमी), मुंबई शहर (६२.९ मिमी), रायगड (५४.१ मिमी) आणि पालघर (४९.७ मिमी) या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहू लागली असून, परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यभरात पावसाचा जोर कायम असून, दररोजच्या जीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, रस्त्यांचे खचणे, आणि नदी नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढणे ही दृश्ये दिसून येत आहेत. प्रशासन सतत नागरिकांशी संपर्कात असून, मदत आणि बचाव कार्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत.

हेही वाचा :

छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणींनी दाखवले तारे; लाथ मारली अन्…, Video Viral

बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं

Love Marriage असो वा अरेंज मॅरेज, का तुटत आहेत नाती? प्रेमानंद महाराजांनी दिले मोठे कारण