कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
बदललेल्या राजकीय संदर्भाच्या पार्श्वभूमीवर (elections)महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रभाकर रचना झाल्यानंतर निवडणुकीचा प्राथमिक पातळीवरचा माहोल तयार होणार आहे. या निवडणुकांना सामोरे कसे जायचे? जे काल शत्रू होते आणि आज मित्र बनले आहेत त्यांच्याच हातात हात घालून मतदारांच्या समोर कसे जायचे? यासह अनेक प्रश्न सोबत घेऊन त्यांच्या उत्तराच्या शोधात निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी शहर आणि जिल्ह्याचा विचार करता काँग्रेसचे स्वतःचे पाटील यांचे या निवडणुकीतूनच राजकीय भवितव्य ठरणार आहे. विधानसभेतील मोठे अपयश धुवून काढण्यासाठी, नेतृत्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, सतेज पाटील यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे मैदान मारायचे आहे. पण त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. तत्कालीन राजकारण आजच्या इतके गुंतागुंतीचे नव्हते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढून नंतर सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येत असत. सतीश पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याच हातात सत्तेचे सूत्रे होती.
पण आता हे दोघेही परस्पर विरुद्ध दिशेला आहेत. एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. हसन मुश्रीफ, प्रकाश अबिटकर, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, विनय कोरे, राजेश क्षीरसागर यांचे परस्परांशी कधीही पटले नाही किंबहुना हे सर्व कधी ना कधी एकमेकांच्या विरोधात होते. (elections)आता हे सर्व महायुती म्हणून एकत्र आलेले दिसतात. हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध कोट्यावधी रुपयांचे अब्रू नुकसानीचे खटले दाखल केले होते. धनंजय महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातही बरेच बिनसले होते. प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर यांच्या तर राजकीय शत्रुत्व होते. विनय कोरे यांनीही त्यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करताना अनेक राजकारण्यांशी पंगा घेतला होता.
आता या सर्वांची “सासू साठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली”अशी अवस्था झाली आहे. महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील हे एका अर्थाने एकाकी पडलेले आहेत. कोल्हापूर, इचलकरंजी या दोन शहरांसह जिल्ह्यात उद्धव ठाकरे सेना तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद फारशी राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या एकट्याच्या खांद्यावरच या निवडणुकांचे ओझे आहे. बदललेल्या राजकारणाचा सर्वात मोठा फटका त्यांना इथे बसलेला आहे. त्यांचे(elections) काही भरवशाचे फलंदाज त्यांना सोडून जात आहेत.गोकुळ सारखी संस्था आता त्यांच्या हातात राहिलेली नाही. महाडिक यांच्यासारखा त्यांचा शत्रू राजकारणात सध्या प्रबळ झालेला आहे.
इचलकरंजी महापालिकेची यंदाची पहिलीच निवडणूक आहे. या शहराचा पहिला महापौर आपल्याच पक्षाचा झाला पाहिजे यासाठी सर्वच नेते प्रयत्नशील आहेत. ही महापालिका जिंकण्याची जबाबदारी आवाडे कुटुंब यांच्यावर प्रामुख्याने सोपवण्यात आलेली आहे. प्रकाश आवाडे यांना आता त्यांची ताराराणी आघाडी विसर्जित करावी लागणार आहे. विशेष म्हणजे ज्यांनी सुळकुड पाणीपुरवठा योजनेला कडाडून विरोध केला त्या हसन मुश्रीफ यांना या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
आज महायुती म्हणून एकत्र आलेले आवाडे आणि मुश्रीफ हे दोघेही या पाणी प्रश्नावरून एकमेकांच्या विरोधात उभा ठाकले होते.एकूणच यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलले आहेत. नेत्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. गट आणि तट विस्कळीत झालेले आहेत. त्याचबरोबर शहरांचे आणि ग्रामीण भागाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि आता त्यामध्ये नव्या समस्यांची वाढ झालेली आहे. पाणी प्रदूषण ही सर्वात मोठी गंभीर समस्या आहे. या प्रतिकूल पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना मात करावी लागणार आहे.
हेही वाचा :