कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :
सध्या सुरू असलेल्या बिगर मोसमी पावसाने कोल्हापूर(rains)सह महाराष्ट्रात पावसाचा हंगाम सुरू झाल्यासारखे वातावरण तयार केले आहे. इतकेच नाही तर अनेक जिल्ह्यात रस्त्यांना, महामार्गांना नद्या नाल्याचे स्वरूप आले होते. याचा अर्थ असा होतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडून नालेसफाई मोठ्या प्रमाणावर झालेली नाही. कोल्हापूर शहरात दोन दिवसापूर्वी झालेल्या तुफानी पावसाने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते आणि गांधी मैदानाला तलावाचे स्वरूप आले होते आणि आजही हे मैदान पाण्यातच आहे. बिगर मोसमी पावसाने शहरांची अशी दैना उडवली आहे तर मग पावसाकडून प्रत्यक्ष बॅटिंग सुरू होईल तेव्हा परिस्थिती कोणते रूप धारण करेल याची कल्पनाच केलेली बरी.

साधारणतः एप्रिल महिन्यात कोल्हापूर शहरासह सर्वच महानगरात नालेसफाई सुरू केली जाते. नाल्यांमधील साचलेला गाळ बाहेर काढून नाल्यांना मोकळा श्वास दिला जातो. मोठ्या प्रमाणावर गाळ काढल्यामुळे भर पावसाळ्यात नाल्यांचे पाणी बाहेर पडू नये, ते थेट नदीमध्ये मिसळले जावे असा त्यामागचा हेतू असतो. नाल्यांचे पाणी नदीत मिसळले नाही तर ते नागरी वस्तीमध्ये घुसते आणि मग पूर स्थिती निर्माण होते. या पूरस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान होते. तसे होऊ नये म्हणूनच नाले सफाई चे काम हाती घेतले जाते. नालेसफाईतून किती टन गाळ बाहेर काढण्यात आला याची आकडेवारी महानगर व्यवस्थापनाकडून सांगितली जाते.
नालेसफाई चे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे तब्बल दोन महिने सुरू असते. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जाते. यंदा अशा प्रकारची नालेसफाई सुरू असतानाच, (rains)बिगर मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. मे महिन्यात अशा प्रकारचा पाऊस अपेक्षित असतो. यंदाही तो अपेक्षितच होता पण तो इतक्या मोठ्या प्रमाणावर बरसेल, कोसळेल
हे कोणालाही अपेक्षित नव्हते. बिगर मोसमी पावसाबद्दलचे हवामान खात्याचे अंदाजही तंतोतंत खरे ठरले आहेत. दोन दिवसापूर्वी बिगर मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला चांगलाच दणका दिला होता.वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने महाराष्ट्रात शेकडो घरांची पडझड झाली, हजारो झाडे उन्मळून पडली. जीवितहानी झाली. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते आणि रस्त्यावर उभी करून ठेवलेली अनेक वाहने या पाण्यात वाहून गेली. राष्ट्रीय महामार्गावर सहा इंच उंच पाणी होते. हे बिगर मोसमीपावसात पहिल्यांदाच घडले आहे.

दुपारनंतर कोसळणाऱ्या पावसामुळे हवेतील उष्मा कमी झाला आहे. पण नालेसफाईच्या कामात अडथळे येत आहेत. बिगर मोसमी पावसाने, उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार केले आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. (rains)त्यामुळे पूर्व रेषेत असणाऱ्या नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण आहे. आत्तापासूनच या गोष्टी मधील लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे नियोजन केले आहे.अनेकांनी भाडेतत्त्वावर घरे घेतली आहेत. घरातील किमती साहित्य आहे त्याच घरात उंचावर सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शहरातील छोट्या मोठ्या नाल्यांची सफाई किमान 70 टक्के पूर्ण होणे अपेक्षित आहे. तथापि अपेक्षेप्रमाणे नाल्यांची सफाई झालेली नाही आणि म्हणूनच बिगर मोसमी पावसाने दिलेल्या दणक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर शहरासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. कधी नव्हे ते पुण्यातील राष्ट्रीय विमानतळ परिसरात पावसाचे पाणी शिरले होते. एकूणच नाले सफाई पूर्ण क्षमतेने झालेली नाही हे यावरून स्पष्ट होते.
यंदा कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना अलमट्टी धरणाने भयग्रस्त करून टाकले आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे. आणि तसे झाले तर कोल्हापूर आणि सांगली हे दोन जिल्हे 70 टक्के पाण्याखाली जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. इसवी सन 2019 आणि 2021 मध्ये या दोन जिल्ह्यांनी जलप्रलय काय असतो याचा अनुभव घेतलेला आहे. आता ही भीती कितीतरी पटीने वाढलेली आहे. केंद्र शासनाने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारला अलमट्टी धरण विषयक तंबी दिली गेली पाहिजे.
हेही वाचा :
अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया