नविद मुश्रीफ ‘गोकुळ’चे नवे अध्यक्ष; कोल्हापुरातील सत्ता-संस्थांवर मुश्रीफ कुटुंबाची पकड बळकट

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावर अखेर नविद मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे. गेले काही दिवस या अध्यक्षपदाभोवती(president) राजकीय वादळ घोंघावत होते. अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमधील नेतृत्वाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा सुरू होती. अखेर निर्णायक बैठकीत नविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

या निवडीमुळे नविद मुश्रीफ, म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव, आता गोकुळच्या प्रमुखपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीला हसन मुश्रीफ यांनीच या निवडीला विरोध दर्शवला होता. तरीही त्यांच्या नावावरच अंतिम निर्णय घेण्यात आला आहे, आणि त्यामुळे या निवडीमागे राज्यपातळीवरून झालेला हस्तक्षेप स्पष्टपणे जाणवतो.

गोकुळ अध्यक्षपदाच्या(president) निवडीवर महायुतीत अंतर्गत दबाव मोठा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष असावा, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे गोकुळच्या संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव बाजूला पडले आणि नविद मुश्रीफ यांच्या नावावर एकमत झाले.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करत नाव ठरवलं आणि ते बंद लिफाफ्यात सुपूर्त करण्यात आलं. आज हा लिफाफा उघडण्यात आला आणि नविद मुश्रीफ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नविद परदेशात असल्यामुळे त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलावण्यात आले, यावरून त्यांच्या नावाची चर्चा अधिकच पक्की झाली होती.

गोकुळच्या अध्यक्षपदासोबतच(president) हसन मुश्रीफ सध्या कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या सहकारी संस्था मुश्रीफ कुटुंबाच्या ताब्यात आल्या आहेत. या संस्था जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेल्या असल्यामुळे, स्थानिक राजकारणात याचे मोठे महत्त्व आहे.

महायुती सरकारच्या पाठबळामुळे हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सत्ता अधिकच बळकट केली आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील ‘समझोता एक्सप्रेस’ राजकारण याआधीही चर्चेत राहिलं आहे, आणि आता महाडिक गटाच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवरही गोकुळमधील निवड अत्यंत महत्त्वाची ठरते.

गोकुळमध्ये अरुण डोंगळे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेलं राजकीय वातावरण आता स्थिर झालं आहे. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी डोंगळेंनी राजीनामा नाकारल्यामुळे अनिश्चितता होती, परंतु संचालकांनी एकजूट दाखवत अखेरच्या क्षणी निर्णय घेतला आणि त्याचा फारसा नकारात्मक परिणाम झाला नाही.

संपूर्ण प्रक्रियेवरून स्पष्ट होतं की कोल्हापूरमधील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांत सत्तासंघर्ष सुरू आहे. मात्र, नविद मुश्रीफ यांची निवड हे दर्शवतं की, सध्या तरी मुश्रीफ कुटुंबाच्या हातात कोल्हापुरातील राजकीय सूत्रं अधिक मजबूत झाली आहेत.

हेही वाचा :