को.म.न.पा. सत्तेचा सोपान शिवसेनेसाठी कठीणच

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील 28 महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(politics) ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पूर्व तयारीचा भाग म्हणून बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. कार्यकर्त्यांना कामाला लागा असे नेत्यांच्याकडून आदेश दिले जात असले तरी कार्यकर्ता सध्या सुस्त आहे. इच्छुक उमेदवारही सार्वजनिक गणेशोत्सवानंतर “जोडण्या”च्या तयारीला लागतील असे सध्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर करावयाचा आहे आणि त्यांच्याकडून आत्तापासूनच तसे प्रयत्न सुरू आहेत. शारंगधर देशमुख यांचा शिवसेनेतील प्रवेश हा त्याचाच एक भाग मानला जातो.

कोल्हापूर शहराचा 70 टक्के भाग हा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात येतो. आणि या मतदारसंघातून शिवसेना(politics) शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे निवडून आले आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर महापालिकेत सत्ता आणावयाची आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर इनकमिंग अपेक्षित आहे. म्हणूनच आमदार क्षीरसागर हे कोल्हापूरच्या राजकारणात कधी नव्हे इतके सक्रिय झाले आहेत. पण ते महापालिका निवडणुकीचा धनुष्य पेलू शकतील? कारण त्यांचं ज्या महापालिका प्रभागात निवासस्थान आहे त्या प्रभागातून त्यांना शिवसेनेचा उमेदवार निवडून आणता आलेला नाही.
दिनांक सहा मे 1986 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहर मतदारसंघातून दिलीप देसाई, सुरेश साळोखे(सलग दोन वेळा) राजेश क्षीरसागर (तीन वेळा) निवडून आले आहेत.

मालोजीराजे छत्रपती, चंद्रकांत जाधव, जयश्री जाधव यांनी शिवसेनेच्या(politics) उमेदवाराचा या मतदारसंघातून पराभव केलेला आहे. कोल्हापूर शहरावर शिवसेनेचा प्रभाव आहे. पण महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी  हा प्रभाव उपयोगाचा ठरलेला नाही. कोल्हापूर महापालिकेवर अविभाजित शिवसेनेचे सुरुवातीला 12 उमेदवार निवडून गेले होते. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. गेल्या सभागृहात शिवसेनेचे अवघे चार सदस्य होते.

कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत महादेवराव महाडिक प्रणित ताराराणी आघाडीशी भारतीय जनता पक्षाने युती केली होती. भारतीय जनता पक्षाचे 14 तर ताराराणी आघाडीचे 19 उमेदवार गेल्या सभागृहात सदस्य होते. याचा अर्थ असा की कोल्हापूर शहरावर शिवसेनेचा प्रभाव असूनही भारतीय जनता पक्षाने 14 सदस्य निवडून आणले होते.

शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर (politics)यांना त्यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांना राजकारणात लॉन्च करावयाचे आहे. ते या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणायची आणि आपल्या चिरंजीवाला महापौर करायचे असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनोमन ठरवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणून दाखवतो असा शब्द दिला आहे. त्यासाठी शिवसेनेत माजी नगरसेवकांचे इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शारंगधर देशमुख यांच्याबरोबर किती माजी नगरसेवक आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून भारतीय जनता पक्षाचे अमल महाडिक आणि उत्तर मधून राजेश क्षीरसागर हे महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. तथापि विधानसभा निवडणुकीतील वातावरण महापालिका निवडणुकीत राहीलच असे नाही. कारण कोल्हापूर महापालिकेवर भाजप व शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश मिळालेले नाही, हे दोन्ही पक्ष सत्तेच्या जवळपासही गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीत चौरंगी प्रभाग पद्धत असणार आहे.

एकूण 25 प्रभाग असल्याने नगरसेवकांची संख्या 100 पर्यंत राहणार आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 50 पेक्षा अधिक संख्याबळ आवश्यक असणार आहे. कोणत्याही एका पक्षाला इतके संख्याबळ जमवणे अशक्य आहे. आणि म्हणूनच निवडणुकी आधी किंवा नंतर महायुती आणि महाविकास आघाडी करावी लागणार आहे. एकूणच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे, पण आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर या महापालिकेतील सत्तेचा सोपान चढणे शिवसेनेसाठी कठीणच आहे.

हेही वाचा :