रायगड जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आज सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. (Sunetra Pawar) यावेळी त्यांनी स्थानिक जनतेशी संवाद साधताना हा क्षण सर्वांसाठी गौरवास्पद असल्याचे नमूद केले. भविष्यात उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कल्याणासाठी आणि कोकणच्या समृद्धीसाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही देखील त्यांनी आपल्या भाषणातून दिली.

रायगड ही केवळ एक प्रशासकीय सीमा नसून ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाने पावन झालेली पवित्र भूमी असल्याचे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. कोकण हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा मुख्य आधारस्तंभ असून अजित पवार यांचे या भागावर विशेष प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. वैयक्तिक जीवनातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी स्पष्ट केले की, सहलीचे नियोजन करतानाही त्यांच्या कुटुंबाची पहिली पसंती नेहमीच कोकणला राहिली आहे.
अदिती तटकरे या मतदारसंघात आपल्या मुलीप्रमाणे कार्यक्षमतेने काम करत असून तटकरे परिवाराशी असलेले स्नेहबंध कायम राहतील असेही त्या म्हणाल्या. रोहा परिसरात सुरू होत असलेल्या नवीन प्रकल्पांमुळे स्थानिक तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अजित पवार यांच्यानंतर त्यांनी सुरू ठेवलेला विकासाचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या मनोगतात सुनेत्रा पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना एक महत्त्वाचे विधान केले. ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये जयललिता किंवा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची ओळख आहे, (Sunetra Pawar) तशीच ओळख भविष्यात संपूर्ण भारतात ‘पहिली वहिनी’ म्हणून सुनेत्रा पवार यांची निर्माण होईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. रायगडमध्ये अशा दर्जाचे पर्यटन प्रकल्प साकारले जातील की पर्यटक गोव्याऐवजी कोकणला पसंती देतील, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकताना तटकरे यांनी त्यांच्या प्रशासकीय शिस्तीचे उदाहरण दिले. बारामती हे देशातील विकासाचे एक आदर्श मॉडेल असून तिथे मध्यरात्रीही कामाचा उरक पाहायला मिळतो, (Sunetra Pawar) असे त्यांनी सांगितले. तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या संकटकाळात असो किंवा दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मूर्ती चोरीचे प्रकरण हाताळताना असो, अजित पवार यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे. विकासाची हीच दृष्टी आता वहिनींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला अनुभवायला मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?