माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग हा केवळ क्रिकेटच्या मैदानावरील योद्धा नाही,(months) तर तो खऱ्या आयुष्यातीलही एक महानायक आहे. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान युवराजला त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आव्हानाचा सामना करावा लागला होता. तो कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरुद्ध लढत होता. २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११ चा वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सर्वोत्तम खेळाडू होता. कर्करोगावर मात करून भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या या खेळाडूने, या जीवघेण्या आजारासोबतच्या आपल्या लढ्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.
तू केवळ तीन ते सहा महिने जगू शकतो, असे त्याला सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे, २०११ च्या वर्ल्ड कपदरम्यान युवराजला रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. तरीही, “देशासाठी वर्ल्ड कप जिंकणे” हे त्याचे एकमेव ध्येय होते. त्याने स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून मैदानात घाम गाळला आणि भारताला विश्वविजेते बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. पण त्यावेळी तो मृत्यूच्या छायेत खेळत होता हे फार कमी लोकांना माहीत होते.
वर्ल्ड कप संपल्यानंतर युवीच्या लक्षात आले की त्याची प्रकृती किती खालावली आहे.(months) “हे स्वीकारणे कठीण होते. कारकिर्दीच्या शिखरावर असताना तुम्ही एका पर्वताच्या माथ्यावर असता आणि मग अचानक एका खड्ड्यात कोसळता. मी दिल्लीत होतो. आम्ही वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार होतो. गांगुली निवृत्त झाला होता आणि माझ्यासाठी कसोटीतील जागा नुकतीच मोकळी झाली होती. मी त्या जागेसाठी सात वर्षे वाट पाहत होतो. मी म्हणालो, ‘मी मेलो तरी चालेल, मला ती जागा हवीच आहे.’ पण माझी प्रकृती अधिकाधिक खालावत गेली.
“डॉ. नितेश रोहतगी मला म्हणाले, ‘ट्यूमर तुमच्या हृदय आणि फुफ्फुसाच्या मध्ये आहे. एकतर तुम्ही क्रिकेट खेळायला जा, नाहीतर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. जर तुम्ही केमोथेरपी केली नाही, तर तुमच्याकडे जगण्यासाठी तीन ते सहा महिने उरले आहेत.’ तेव्हा माझ्या लक्षात आले की मला विचार करायला हवा,” असे युवराजने ‘द ओव्हरलॅप क्रिकेट’वर मायकल वॉन याच्याशी बोलताना सांगितले.
निदान झाल्यानंतर युवराज उपचारांसाठी अमेरिकेला गेला. तिथे त्याला (months) अतिशय वेदनादायक केमोथेरपीच्या प्रक्रियेतून जावे लागले. कर्करोगाला हरवून तो केवळ बराच झाला नाही, तर त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करून सर्वांना थक्क केले. युवराजने पुढे सांगितले की, उपचारादरम्यान तो क्रिकेटचे व्हिडिओ पाहत असे. याच काळात अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांनी त्याला भेट दिली. कुंबळेंनी त्याला विश्रांती घेण्याचा आणि व्हिडिओ पाहून मनावर ताण न घेण्याचा सल्लाही दिला होता.