छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रायगडावर नवीन अत्याधुनिक रोपवे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, (Raigad) यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. विशेष म्हणजे रोपवेच्या तिकीट दरात मोठी कपात होणार असल्याने शिवभक्त आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिवभक्तांना कमी खर्चात रायगड दर्शन सध्या रायगडावर जाण्यासाठी खासगी कंपनीचा रोपवे उपलब्ध असून त्यासाठी प्रतिव्यक्ती सुमारे 250 रुपये मोजावे लागतात. हा खर्च अनेक सामान्य कुटुंबांना परवडत नसल्याने अनेकजण पायऱ्यांमार्गे गड चढण्याचा पर्याय निवडतात. मात्र, वृद्ध नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना हा प्रवास करणे कठीण ठरत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.राज्य सरकारने आता नवीन आधुनिक रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला असून, तो सुरू झाल्यानंतर तिकीट दर 50 ते 100 रुपयांच्या दरम्यान असतील. (Raigad) त्यामुळे कोणत्याही वयोगटातील शिवभक्तांना कमी खर्चात आणि अल्प वेळात रायगडावर पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संवर्धनासाठीही होणार मोठी बचत रायगडावर प्रस्तावित नव्या रोपवेच्या प्रकल्पाला भारतीय पुरातत्त्व विभागाची मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसह गडावरील विविध विकासकामांनाही मोठा फायदा होणार आहे.रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी लागणारे साहित्य गडावर पोहोचवताना सध्याच्या खासगी रोपवेचा प्रतिकिलो 6.3 रुपये इतका खर्च येतो. (Raigad) त्यामुळे विकासकामांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारी मालकीचा नवीन रोपवे सुरू झाल्यानंतर वाहतुकीवरील हा खर्च कमी होईल आणि वाचलेला निधी गडाच्या संवर्धन व विकासासाठी वापरणे शक्य होणार आहे.
हेही वाचा :
पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?
कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?
30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?