महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. आगामी चार दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करत भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले आहेत.(Rains) नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

कोकण, मुंबईसह अनेक जिल्ह्यांवर पावसाचा इशारा 20 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अभाव जाणवत होता. मात्र त्यानंतर वातावरणात मोठा बदल झाला आणि राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी नद्या आणि नाल्यांनाही पूर आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने 2 जुलै रोजी पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून 3 आणि 4 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे जिल्ह्यातही पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहरात 2 ते 5 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Rains) तसेच रायगड जिल्ह्यासाठी 2 जुलैला ऑरेंज अलर्ट आणि 3 जुलै रोजी थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण आणि मुंबईप्रमाणेच विदर्भ विभागातही पुढील तीन ते चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागपूर आणि परिसरातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील 48 ते 72 तासांत समाधानकारक ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज नागपूर शहरातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. जून महिना बहुतांश ठिकाणी उष्ण आणि तुलनेने कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने वेग पकडला आहे. (Rains) त्यामुळे शेतीसह सर्वसामान्य नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा असली तरी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना आणि प्रशासनाने जारी केलेल्या इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये?
पुणे-नाशिककरांनो रेल्वे संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी?
WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?