कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
शरद पवार हे राजकारणी म्हणून जितके परिचित आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बेरकी राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत.(politician ) उद्धव आणि राज हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेले असताना या चर्चेचा रूपांतर वास्तवता होऊ नये असे शरद पवार यांना वाटत असावे आणि म्हणूनच त्यांनी किरकस वक्तव्य केले आहे. राज ठाकरे यांच्या मनसे शीयुती करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोणताही राजकीय फायदा होणार नाही असे त्यांनी आपले राजकीय मत व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी कायम राहावी असा त्यांचा त्यामागचा हेतू आहे. उद्धव ठाकरे यांची उबाठा सेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती झाली तर महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. तेव्हा असे काही घडू नये असे शरद पवार यांच्या मनात आहे. आणि म्हणूनच त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते पण त्यांना लोकांची मते मिळत नाहीत आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतदान वळवण्यात करतात असे वक्तव्य केले आहे.
म्हणजे राज ठाकरे यांच्याशी युती करून उद्धव ठाकरेंना कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा होऊ शकत नाही. मग राज ठाकरे यांच्याशी युती करून काय उपयोग? असे त्यांना म्हणावयाचे आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी राज यांच्याशी हात मिळवणी करू नये अशी त्यांची भूमिका आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर आपणच स्थापन केलेली महाविकास आघाडी धोक्यात येऊ शकते. आघाडीचे अस्तित्व टिकवून ठेवावयाचे असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र येता कामा नये.
म्हणून ते राज ठाकरे यांच्या उपयुक्ततेबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात शंका यावी असे वातावरण तयार करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार नाहीत असेही शरद पवार यांनी सुचित केले आहे. कारण हे दोन्ही गट एकत्र आले तर महा विकास आघाडीचे अस्तित्व संपते.(politician ) एकूणच शरद पवार यांना राजकीय पक्षांचे ध्रुवीकरण नको आहे सध्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करण्याचे संकेत दिले जात आहेत. राऊत यांनी राज ठाकरे यांच्या विषयी एकदम मवाळ भूमिका घेतलेली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाला राऊत हे कॉफी हाऊस म्हणून हिणवायचे.
त्यामुळे अमित ठाकरे यांनी राऊत यांना एकदा आमच्या कॅफेटेरीयाला भेट द्या. अशा उपरोधिक भाषेत निमंत्रण दिले आहे.महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी इसवी सन 2014 आणि इसवी सन 2017 मध्ये आम्ही त्यांच्याकडे टाळीसाठी हात दिला होता, पण त्यांनीच हात पुढे केला नाही. अशी आठवण करून दिली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी युती बद्दलचे सकारात्मक वातावरण तयार केले असले तरी चर्चेच्या पलीकडे ठोस असे काही घडत आहे असे दिसत नाही. राज ठाकरे यांनीही युतीविषयक कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे यापेक्षा या ठाकरे बंधूंच्या मनात नेमके काय आहे याचाच अंदाज लागत नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करावयाची असेल तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस बरोबरची साथ सोडावी लागेल. असे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे तर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडून आम्ही महाविकास आघाडीशी फारकत घेऊ असे म्हटलेले नाही. राज ठाकरे यांची शरद पवार यांच्या विषयीची मते टोकाची आहेत. (politician )महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण शरद पवार यांनीच सुरू केले. शरद पवार हेजातीयवादी आहेत असे राज ठाकरे यांनी अनेक वेळा सांगितले आहे तर पवार यांनीही राज ठाकरे यांच्यावर जहाल टीका केलेली आहे.
आता तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना कोणताही राजकीय फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांनी युती करू नये असा सल्ला पवार यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे दिलेला आहे. एकूणच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि आता तर या चर्चेला उधाण आलेले आहे. या चर्चेचे रूपांतर युतीमध्ये होणार का हे नजीकच्या काही दिवसात स्पष्ट होईल.
हेही वाचा :