समजा, असे घडलंच तर ? राजकीय उलथापालथ होणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शरद पवार, अजितदादा पवार आणि जयंत पाटील हे तिघे संस्थात्मक व्यासपीठावर एकत्र आले, तिघांची बंद दाराआड चर्चा झाली की, महाराष्ट्राच्या राजकीय(political ) मंचावर
काका पुतणे “एकत्र येणार” या बंद पडलेल्या नाटकाचे प्रयोग पुन्हा लावले जातात, तसेच उद्धव आणि राज हे कौटुंबिक सोहळ्यात समोरासमोर आले की,”दे टाळी!”चे शिवाजी पार्क परिसरात दोन्ही बाजूंच्या सैनिकांकडून”पथनाट्य”सुरू केले जाते. प्रत्यक्षात काही घडतच नाही. मीडियाच्या “सूत्रा”चा मग पालापाचोळा होतो.

रयत, राज्य सहकारी बँक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वगैरे महत्त्वाच्या संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. या संस्थांच्या बैठका अजून मधून होत असतात. अशीच एक बैठक रविवारी झाली. काका आणि पुतणे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात “कानोकांनी”ही झाली. त्यानंतर की आधी बंद दाराआड झालेले चर्चेत जयंत पाटील हे सुद्धा सहभागी झाले होते. आतील चर्चेचे तपशील बाहेर कधीच येत नाहीत. राजकीय चर्चा झाली नाही असे मात्र आवर्जून सांगितले जाते.

आम्ही एकत्र येणार या चर्चेचे शरद पवार यांनी नुकतेच खंडणही केले आहे पण तरीही”एकत्र येणार”या नाटकाचे प्रयोग पुन्हा लावले जात आहेत. आणि त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सुप्रिया सुळे या निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असा आत्मविश्वास त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे. शरद पवार हे जे बोलतात, नेमकी त्याच्या उलट त्यांची कृती असते. असे अनेकदा घडलेले आहे.

आम्ही एकत्र येण्याची चर्चा नाही असे त्यांनी सांगितले असले तरी त्यांच्या गुढ राजकारणाप्रमाणे(political )नेमके उलटे घडले तर! राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर? महाराष्ट्रासाठी तो मोठा राजकीय भूकंप ठरेल. इसवी सन 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्ष्यांची महा विकास आघाडी स्थापन केली होती. उद्धव ठाकरे यांना त्यांनी मुख्यमंत्री केले होते. त्यानंतर अवघ्या अडीच तीन वर्षात आधी शिवसेना फुटली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित दादा पवार यांनी शरद पवार यांच्याकडील पक्ष हायजॅक केला.

 

आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर शरद पवार यांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी दुभांगणार किंवा ती विसर्जित केली जाणार. शरद पवार यांना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्याशी राजकीय फारकत घ्यावी लागणार.वैचारीक बैठकीला मुरड घालून अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली राहावे लागणार. इसवी सन 2014 मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन सर्वांना चकित करून सोडले होते.

राजकारणात “राजकीय(political )अस्पृश्यता”आपण पाळत नाही असे त्यांनीच काही वर्षांपूर्वी स्पष्ट केले होते. शरद पवार आणि अजित दादा पवार हे दोघे एकत्र आले, पाठोपाठ राजकीय गरज म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचा तंबू राहणार नाही. राज ठाकरे यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेला दोस्ताना
बासनात गुंडाळून ठेवावा लागेल. म्हणजे महायुतीला थोड्याफार प्रमाणात अडचण येणार आहे. एकूणच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होईल. तो राजकीय भूकंप ठरेल. अर्थात “आत्याबाईला मिश्या असत्या तर?”अशाच प्रकारचे हे राजकारण म्हणावे लागेल.

हेही वाचा :