पैशांची हाव आणि मुलगाच हवा या अघोरी मानसिकतेने पुन्हा एकदा एका निष्पाप लेकीचा बळी घेतला आहे.सायबर चौकातील काटकर मळ्यामध्ये अस्मिता प्रतीकसिंग काटकर (वय २९) हिने जीवन संपवल्याने संपूर्ण कोल्हापूर हादरले आहे. ‘मुलगी का झाली?’ अशी विचारणा करत ‘माहेरून आणखी पाच तोळे सोने व पाच लाख रुपये आण,’ असे म्हणत पती, सासू, सासरे आणि नणंदेने दिलेल्या असह्य मानसिक व शारीरिक छळाला कंटाळूनच अस्मिताने जीवनयात्रा संपवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. (Kolhapur) याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पती प्रतीकसिंग वीरेंद्रसिंग काटकर (३०), सासरे वीरेंद्रसिंग विलासराव काटकर (५८), सासू मनीषा (५१) आणि नणंद ऋतुजा (२५) या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

२६ नोव्हेंबर २०२४ रोजी कोल्हापुरातील एका आलिशान हॉलमध्ये अस्मिता आणि प्रतीकसिंग यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता. पोटच्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी आई संगीता अजित सरदेसाई यांनी लग्नात ९ तोळे सोने आणि तब्बल ५ लाख रुपयांचा संसारसेट दिला होता; पण सासरच्या नराधमांची पैशांची हाव सुटली नव्हती. क्रूरतेचा कळस नातेवाईकांच्या लग्नात अस्मिताने पतीसोबत डान्स केला नाही, या एवढ्याशा कारणावरून तिचा छळ सुरू करण्यात आला. माहेरून आणखी ५ तोळे सोने आणि ५ लाख रुपये रोख आण, (Kolhapur) म्हणून तिला सतत मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. त्यातच महिनाभरापूर्वी अस्मिताने एका गोंडस चिमुरडीला जन्म दिला. परंतु, मुलगी झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी सासरच्यांनी तिचा छळ तीव्र केला. या छळाला कंटाळून अस्मिताने जगाचा निरोप घेतला.
खुनाच्या कोनातूनही तपास; ‘व्हिसेरा’ अहवालाकडे लक्ष ‘माझ्या निष्पाप मुलीचा खून झाला असून संशयितांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे,’ (Kolhapur) अशी मागणी अश्रू आवरत आई संगीता सरदेसाई यांनी केली आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाचा खुनाच्या शक्यतेनेही तपास करत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अनिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या विधानांची पडताळणी, घराचे व परिसराचे सीसीटीव्ही फुटेज आणि मंगल कार्यालयांकडे चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनाचा व्हिसेरा अहवाल आल्यानंतर अस्मिताच्या मृत्यूमागचे सत्य समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?