कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काळी जादू, करणे धरणी, चेटूक, भानामती आणि गावापासून दूर असलेली स्मशानभूमी(Cemetery) यांचा एकमेकांशी संबंध जोडला जातो किंवा असा संबंध जोडण्याचे प्रकार काल होते, आज होत आहेत आणि ते उद्याही होत राहणार आहेत. आपल्यावर जी संकटे येतात त्याचा वास्तवाशी निगडित विचार केला जात नाही. विवेक बुद्धी वापरली जात नाही. जे काही आपल्या संदर्भात वाईट घडतंय ते सैतानाचे, चेटकिणीचे काम आहे.

या गैरसमजुतीचे समाजातून ज्या दिवशी समूळ उच्चाटन होईल त्या दिवशी हे प्रकार थांबतील. पण ही अतिशय दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. कोल्हापूर सांगली रस्त्यावरच्या उदगावच्या स्मशानभूमीतील(Cemetery) तो अघोरी प्रकार डिजिटल क्रांतीमुळे समाजाच्या समोर आला आहे. हे तंत्रज्ञान नव्हते तेव्हा स्मशानभूमीत”रात्रीस खेळ चाले”हे समजून येत नव्हते.
राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी भूमीत अघोरी प्रकार कसे? असा प्रश्न अशा अंधारातील घटना उजेडात आल्यानंतर उपस्थित केला जातो. पण असे अघोरी प्रकार कोल्हापुरात, महाराष्ट्रात, देशात कुठे ना कुठे सुरूच असतात. पण जगातील अनेक विकसित आणि अविकसित देशात असे प्रकार अनेक शतकांपासून सुरू आहेत आणि आजही त्यात फार फरक पडला आहे असे नाही. सोळाव्या शतकापासून या अंधविश्वासाच्या विरोधी अनेक देशात कठोर कायदे करण्यात आले आहेत.
काही देशात या कायद्यात देह दंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली होती. ती आता नसली तरी या 21व्या शतकात असे अंध विश्वासाविरुद्धचे कायदे बहुतांशी देशात आहेत. भारताचे होते आणि आज आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा आणखी एक सुधारित कायदा महाराष्ट्रासाठी करण्यात आला.
महाराष्ट्र मानव नरबळी आणि इतर अमानुष दृष्ट अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक व निर्मूलन कायदा 2013 असे या कायद्याचे नाव आहे. लोकांना असे वाटते की वाईट गोष्टी शैतान किंवा चेटकीनी करतात. म्हणूनच समाजात जागृती निर्माण करण्यासाठी, अनिष्ट प्रथापासून रक्षण करण्यासाठी, नरबळी, भानामती, करणी धरणी, अशोक यांच्याशी लढण्यासाठी अंधविश्वासाचे उच्चाटन करण्यासाठी, निरोगी आणि सुरक्षित सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.
समाजातील इतर अवयव व्यवसाय मोडून काढण्यासाठी प्रचलित कायद्यानुसार पोलीस स्वतः पुढे येऊन कारवाई करतात. शेकडो गुन्हे दाखल होतात तर मग जादूटोणा प्रतिबंधक प्रचलित कायद्याची दखल पोलीस प्रशासनाकडून का घेतली जात नाही? कुणीतरी माहिती दिली तरच कारवाई केली जाते. अंधविश्वास निर्माण करणारे, जादूटोणा करणारे, भानामती करणारे गावापासून दूर असलेल्या स्मशानात( Cemetery)”मध्यरात्रीस खेळ चालवणारे”मुठभर लोक आहेत. त्यांची नावे सहज उपलब्ध होतात. त्यांच्या गूढ हालचालीवर लक्ष का ठेवले जात नाही? त्यांच्यातीलच एखादा खबरी तयार केला का जात नाही?
काही दिवसांपूर्वी पंचगंगा नदीच्या घाटावर मध्यरात्री “भूत”काढण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडून तपास सुरू असतानाच कोल्हापूर सांगली रस्त्यावर असलेल्या सहज दृष्टीपथात येणाऱ्या उदगावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री स्त्री आणि पुरुषांकडून नग्न होऊन काही विधी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असे प्रकार कालही घडत होते, पण तेव्हा आजच्यासारखे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.
तसेच मध्यरात्री स्मशानाकडे(Cemetery) कुणी अकारण फिरकण्याचा प्रश्नच नसतो. शहरातील स्मशानभूमीत असे क्वचितच प्रकार घडतात. मात्र ग्रामीण भागातील स्मशानभूमीकडे कोणीही फारसे फिरकत नाही. त्याचाच फायदा घेतला जातो. स्मशान भूमी मध्ये एक प्रकारचे गुढ गंभीर वातावरण असते. काही अफवांच्या माध्यमातून गूढ घटनांची निर्मिती करून त्याचा प्रसार केला जातो. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या अनेक भयपटांनी अफवांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे.
आता तर राज्याचे एक कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या महाड मधील बंगल्यात अघोरी पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी सुद्धा तो छोट्या पडद्यावर दाखवला आहे. त्याबद्दल त्यांनी केलेला खुलासा पटण्यासारखा नाही. पण एक मंत्रीच असा प्रकार करत असेल तर मग सामान्य माणसाची काय कथा?

अगदी सामान्य माणसाबद्दलही सांगता येईल. हाच माणूस प्रत्येक अमावस्येला आपल्या दुचाकी किंवा चार चाकी, तीन चाकी वाहनांची पूजा करून लिंबू मिरच्या बिब्बा एकत्रित बांधून वाहनाच्या पुढील किंवा मागील बाजूला लावतो. खरे तर असा हा अंधविश्वास सर्रास खुलेआमपणे सुरू असतो त्याला काय म्हणाल? वाहनाची देखभाल या लिंबू मिरची शिवाय करता येते. म्हणूनच अंधविश्वासाविरुद्धची लढाई सहज आणि सोपी नाही असे म्हणता येईल.
मेंदूतील काही बिघाडामुळे मानसिक संतुलन बिघडते. त्यावर मानसोपचार तज्ञ किंवा मेंदू विकार तज्ञ यांच्याकडून उपचार करून घेणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे. तथापि संबंधित उपचार पद्धती अत्यंत महागडी असते. अशा प्रकारचे उपचार शासकीय योजनेतून केले जात नाहीत. त्यामुळे स्वस्तातील पर्याय म्हणून तांत्रिक आणि भोंदू बाबा यांचा आधार घेतला जातो. त्यांच्याकडून संबंधित रुग्णाला भुताने पछाडले आहे, त्याला बाहेर काढावे लागेल असे सांगून काही अघोरी पूजाविधी केले जातात. हा एक उपचाराचा प्रकार असल्याचे भोंदू बाबा कडून सांगितले जाते. आणि मग सामान्य माणूस अपरिहार्यता म्हणून भोंदू बाबा जे जे सांगेल ते ते करावयास तयार होतो.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर मध्यरात्री सुरू असलेला भूत काढण्याचा आघोरी प्रकार किंवा उदगावच्या स्मशानभूमीत(Cemetery) विवस्त्र होऊन केली जाणारी अघोरी पूजा हा त्याचाच एक भाग आहे. याला आळा घालण्यासाठी लोकप्रबोधन गरजेचे आहे, आणि खंड पडू न देता अशा प्रकारचे प्रबोधन होत राहिले तर हे अघोरी प्रकार थांबतील पण त्यासाठी बराच कालावधी द्यावा लागेल. पोलीस प्रशासनाला सुद्धा यात कठोर भूमिका घ्यावी लागेल. अशा प्रकारचे अघोरी प्रकार करणाऱ्यां तांत्रिक , मांत्रिकाना वठणीवर आणले तर, बऱ्यापैकी आळा बसू शकतो.
हेही वाचा :
श्रध्दा अकॅडमीचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची महाराष्ट्र कामगार सेनेची मागणी
श्रध्दा अकॅडमी प्रकरण : पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जातोय का? – गंभीर प्रश्न उपस्थित
“माझ्या मुलाचाही अतोनात छळ केलाय!” – रवींद्र रणभिसे यांचा श्रध्दा अकॅडमीवर गंभीर आरोप