हार्बर मार्गावरील सिडकोने निर्माण केलेल्या रेल्वे स्थानकांपैकी तीन रेल्वे स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत आज तीन रेल्वे स्थानकांची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. म्हस्के यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मध्य रेल्वे आणि सिडको यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अनेक वर्षे प्रवाशांचे सुविधांअभावी सुरू असलेले हाल संपणार आहेत. सिडकोच्या अखत्यारीतील तीन महत्त्वाची स्थानके सोमवारी (ता. २२) अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. उर्वरित स्थानकेही लवकरच हस्तांतरित होणार आहेत. सिडकोच्या ताब्यातील वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांचे देखभाल करार अनुक्रमे २००३ आणि २००८मध्येच संपले होते. (Railway) त्यानंतर नवा करार झाला नव्हता.

ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार न झाल्याने सुविधांअभावी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. अतिरिक्त जागा आणि त्यांच्या देखभालीसंदर्भातील विषयांवर सिडको व रेल्वे यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे प्रवाशांच्या वतीने शिवसैनिकांनी स्वागत केले. खासदार म्हस्के यांनी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून दिल्ली येथील बैठकांत हा विषय वारंवार मांडला. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. १५ मे २०२६ रोजी खासदार म्हस्के (Railway) यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वे आणि सिडको अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सहा महिन्यांत स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बेलापूर येथील सिडको भवनमध्ये सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. रेल्वेतर्फे अभिषेककुमार गुप्ता, संतोष गुंजन, जी. जवाहरलाल, संजय चौरसिया, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी, सहाय्यक अभियंता सी. पितळे, बेलापूर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, युवा सेनेचे अनिकेत म्हात्रे, गट नेता मनोज हळदणकर, युवा नेता दत्ता घंगाळे आदी मान्यवर होते. (Railway) गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नव्हत्या; मात्र आता स्थानके रेल्वेच्या ताब्यात गेल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगल्या, दर्जेदार आणि सुसज्ज सुविधा मिळतील. हा निर्णय नवी मुंबईकरांच्या हिताचा आहे.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?