मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांची सोन्याची साखळी (चेन) हिसकावणाऱ्या चौघांना ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने काही तासांतच अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

अविनाश परशुराम भारसकले, शिवराज दशरथ कुचिकोरवी, विनोद रामचंद्र मुळके (सर्व रा. सायन-धारावी, मुंबई) आणि अमोल संक्काप्पा कुचीवाले (रा. ईश्वरपूर) अशी संशयितांची नावे आहेत. (Ishwarpur) त्यांच्याकडून सोन्याची साखळी, तीन दुचाकी आणि मोबाईल, असा ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
येथील रहिवासी नारायण बंडू माळी आणि त्यांच्या पत्नी राधा हे ७ जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. अग्निशामक कार्यालय परिसरात दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. या वेळी एकाने नारायण यांचे दोन्ही हात पकडून ठेवले, तर दुसऱ्याने राधा यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. या प्रकारानंतर नारायण माळी आणि त्यांचे मित्र अतुल सूर्यवंशी यांनी संशयितांचा पाठलाग केला. (Ishwarpur) त्यांनी नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने संशयित शिवराज याला घटनास्थळावरून पकडले.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने तपास करत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील (Ishwarpur) यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचला आणि उर्वरित संशयित अविनाश, विनोद व अमोल यांना बेड्या ठोकल्या.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे, हवालदार कुबेर खोत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दीपक घस्ते, सुशील पाटील, चंद्रकांत वंजारी, वैभव जाधव, यशवंत कोळी, जयकर सुतार तसेच सायबर पोलिस ठाण्यातील विजय पाटणकर, अभिजित पाटील, अजय पाटील आणि कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी