महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून एप्रिलच्या अखेरीसच तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विशेषतः महाराष्ट्र मधील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील भाग अक्षरशः तापमानाच्या कचाट्यात सापडले आहेत. अकोला येथे रविवारी तब्बल ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, (record) जे राज्यातीलच नव्हे तर देशातीलही सर्वाधिक तापमान ठरले. त्याचप्रमाणे अमरावती येथे ४६.८ आणि वर्धा येथे ४६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. या तीव्र उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शहरांमधील रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर येथे ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात किंचित घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी सध्या उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.
राज्यातील हवामान सध्या विरोधाभासी स्थितीत आहे. काही भागांत तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असताना, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शहरातही उष्णतेची तीव्रता वाढली असून कमाल तापमान ४१ अंशांवर पोहोचले आहे. कोरेगाव पार्क आणि लोहगाव परिसरात तापमानाने ४३ अंशांचा टप्पा पार केला आहे, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हवामानातील या बदलांमागे विविध वातावरणीय घडामोडी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव अद्याप कायम आहे, तर दक्षिणेकडे वाऱ्यांची खंडित स्थिती तयार झाली आहे. याशिवाय मध्य भारत आणि पूर्वेकडील भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती असल्याने वातावरणातील आर्द्रतेत चढ-उतार होत आहेत. या सर्व घटकांमुळे महाराष्ट्राच्या हवामानात अचानक बदल होत असून उष्णतेसोबतच ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता निर्माण होत आहे.
सध्या राज्यातील नागरिकांना कडक उन्हासोबतच वाढत्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासूनच कडक ऊन जाणवत असून रात्रीही उष्णतेचा प्रभाव कमी होत नसल्याने लोकांना दिलासा मिळत नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता असली तरी उष्णतेची लाट पूर्णपणे ओसरण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे.
हेही वाचा
बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या 17 दिवसांनी आरोपी अटकेत