कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हुंडा प्रतिबंधक कायदा हा असून नसल्यासारखा असल्याचे वैष्णवी हगवणे या तरुणीच्या आत्महत्या(Suicide) प्रकरणाने सिद्ध झाले आहे. पण आता मराठा समाजाने जिल्हा निहाय बैठका घेऊन हुंडा प्रथेचे उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजातील विवाह समारंभासाठी एक आचारसंहिता जारी केली आहे. तिचे स्वागतच करायला हवे, पण या आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा निहाय, गावनिहाय दबाव गट स्थापन केले गेले पाहिजेत.
हिंदू विवाह संस्कारामध्ये साखरपुडा हा एक विधी असतो. याचवेळी वधू आणि वर पक्षांमध्ये देण्या घेण्याचे व्यवहार ठरतात. ते लिखित स्वरूपात असतात. त्यावर दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच लोकांच्या साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या असतात. हुंडा या शब्दा ऐवजी वरदक्षिणा असा एक शब्दप्रयोग या कागदावर केलेला असतो. वधू कडून वराला आणि वराकडून वधूला सुवर्ण अलंकार, वस्त्र अलंकार, मानपान अशा प्रकारच्या देण्याघेण्याच्या नोंदी केल्या जातात. त्याला प्रचलित भाषेत “यादी” म्हणतात. हुंडा प्रतिबंधक कायद्याला कागदावरच ठेवण्याची सुरुवात साखरपुड्यापासूनच होते. वैष्णवी चे माहेर आणि सासर आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या विवाह सोहळ्यात अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. वैष्णवीच्या माहेरची श्रीमंती आणि सासरच्या मंडळींची प्रचंड लालसा याचा एकत्रित परिणाम म्हणजे वैष्णवीची आत्महत्या (Suicide)होय. हे प्रकरण राज्यभर गाजू लागल्यानंतर मराठा समाजातील जेष्ठ मंडळींनी एकत्र येऊन असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आचारसंहिताच जारी केली आहे. हुंडा द्यायचा नाही. त्या ऐवजी शक्य असेल तर मुलीच्या नावावर एफडी करणे, विवाह समारंभात 200 पेक्षा अधिक निमंत्रित असता कामा नयेत, भोजन कार्यक्रमात पाच पेक्षा अधिक पदार्थ असता कामा नयेत. वधू-वरांचे वडील यांनाच फेटे बांधले जावेत, हळद, साखरपुडा आणि विवाह हे तिन्ही विधी एकाच दिवशी केले जावेत, प्री वेडिंग या नव्या प्रथेला थारा देऊ नये, विवाह संस्काराचे पावित्र्य जपून सर्व विधी व्हावेत अशा प्रकारची आचारसंहिता मराठा समाजाने जारी केली आहे. या निर्णयाचे स्वागत झाले पाहिजे पण त्याचबरोबर या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे.
हल्ली विवाह संस्काराला उत्साही स्वरूप आले आहे. मंडपात, मंगल कार्यालयात विवाह झाले पाहिजेत, तथापि श्रीमंतांच्याकडून विवाहाला इव्हेंटचे स्वरूप दिले जात आहे. मंगल कार्यालया ऐवजी आलिशान फार्म हाऊस, महागडी रिसॉर्ट्स, तारांकित हॉटेल्स इथे विवाह सोहळे आयोजित केले जाऊ लागले आहेत. राजस्थानी जैन समाजाच्या धर्मगुरूंनी अशाच प्रकारची आचारसंहिता अनेक वर्षांपूर्वी जारी केली आहे.
या आचारसंहितेशी बांधील राहून विवाह सोहाळे होत असले तरी, अतिश्रीमंत घराण्याकडून आचारसंहितेला बाजूला ठेवले जाते आहे. त्यांच्याकडून विवाह सोहळ्यावर करोडो रुपये खर्च केले जातात. विवाह समारंभाला 110 पेक्षा जास्त निमंत्रित असता कामा नयेत, विवाह समारंभ हे गोरज मुहूर्तावर केले जाऊ नयेत, भोजन कार्यक्रमात पदार्थांची रेलचेल असता कामा नये, फटाके फोडले जाऊ नयेत अशा प्रकारची ही आचारसंहिता आहे. काही अपवाद वगळता आचारसंहितेची बऱ्यापैकी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येते.
फार वर्षांपूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात हुंडा हा प्रकार नव्हता, उलट वर पक्षांकडून वधुपक्षाला काही रक्कम तेव्हा द्यावी लागत असे. रोख पैसे किंवा चांदी, सोने या स्वरूपात वर पक्षाकडून वधु पित्याला दिले जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात वधू कडून वराला हुंडा देण्याची पद्धत सुरू झाली आणि ती आता तर वाढतच गेली आहे(Suicide). त्याला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून शासनाने हुंडा प्रतिबंधक कायदा केला. तथापी या कायद्याला निष्प्रभ करण्यात आले.
विवाह झाल्यानंतर, सात वर्षाच्या आत एखाद्या तरुणीचा मृत्यू झाला तर तो हुंडाबळीचा प्रकार आहे असे समजून पोलिसांनी त्याची दखल घेतली पाहिजे असाही एक कायदा आहे. पण त्याचीही दखल कुणी घेत नाही. नवविवाहितेचा मृत्यू संशयास्पद असेल आणि त्याबद्दल तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली तरच दखल घेतली जाते. हिंदू धर्मात विवाह हा 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार समजला जातो. पण आता या संस्कारालाही छेद देणाऱ्या घटना घडताना दिसतात. लिव्ह अँड रिलेशनशिप हा नवीनच प्रकार सुरू झाला आहे आणि त्यातून काही प्रश्नही निर्माण झालेले पाहायला मिळतात.
हेही वाचा :