छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावात राहणारा 20 वर्षांचा विनय वर्मा… सर्वसामान्यांप्रमाणे राहणारा, वागणारा हा मुलगा आयटीआयमधून इलेक्ट्रिशियनमध्ये डिप्लोमा करत होता. मात्र, त्याचं त्याच्या गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं. रात्रंदिवस तो तिच्याच विचारांत हरवलेला असायचा. पण त्या मुलीला विनयच्या भावनांबद्दल काही घेणंदेणं नव्हतं.
अखेर काही महिन्यांपूर्वी त्या मुलीचे लग्न अफसर खान नावाच्या माणसाशी झाले. ही बातमी विनयला कळताच त्याचं प्रेम आणि तिचा ध्यास कमी होण्याऐवजी वाढत गेला. त्याने विचार केला की जर त्याने अफसर खानला काटा काढला तर कदाचित त्याला त्याचं प्रेम मिळेल. याच धोकादायक विचाराने त्याने त्याच्या मनात एक भयानक कट रचला.
इंटरनेटवर शिकला बॉम्ब बनवण्याची पद्धत
विनयने ठरवले की तो त्या तरूणीच्या पतीला मारणार. हाच ध्यास घेऊन तो इंटरनेटवर बॉम्ब कसा बनवायचा हे शिकला. तो दिवसरात्र ऑनलाइन व्हिडिओ पाहत असे, पुस्तके वाचत असे आणि हळूहळू 2 किलोचा धोकादायक बॉम्ब तयार करू लागल. त्याला वाटले की हा बॉम्ब इतका शक्तिशाली असेल की त्याचे काम सहज होईल. अखेर त्याने तो बॉम्ब एका स्पीकरमध्ये लपवून ठेवला आणि तो एका पॅकेटमध्ये पॅक केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने पॅकेटवर इंडिया पोस्टचा बनावट स्टॅम्प लावला. त्यानंतर त्याने हे पॅकेट 15 ऑगस्ट रोजी अधिकाऱ्याच्या दुकानात पाठवले.
अशी झाली पोलखोल
जेव्हा त्या तरूणीच्या पतीला हे पॅकेट मिळालं तेव्हा त्याला वाटलं की हे लग्नाचं एखादं गिफ्च आहे, पण पॅकेटचं वजन जरा जास्तच होतं. तेवढ्यात त्याला त्याच्या पत्नीचं बोलणं आठवलं, तिने त्याला बरेच वेळा सांगितलं होतं की विनय तिच्याकडे विचित्र नजरेने पहायचा, तिचा पाठलाग करायचा. पत्नीने असेही बजावले होते की विनय काहीतरी वाईट करू शकतो. त्यामुळे ते आठवताच तिच्या पतीने विलंब न करता पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पॅकेट उघडताच सर्वांना धक्का बसला. स्पीकरमध्ये 2 किलोचा IED (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) होता. जर कोणी तो चालू केला असता तर नको ते घडू शकलं असतं.