अपुऱ्या पावसामुळे आणि धरणांतील घटत्या पाणीसाठ्यामुळे पुणे शहरातील नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाने आजपासून म्हणजेच सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रक आजपासून अमलात आले असून नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पावसाच्या प्रतीक्षेत वाढलेली चिंता 15 जूनपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध साठा धोक्याच्या पातळीपर्यंत घसरला आहे. यंदा ‘एल निनो’ च्या प्रभावामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. (water) आता त्याचे परिणाम प्रत्यक्ष दिसू लागल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सध्या पुणे महानगरपालिका दररोज सुमारे 1600 एमएलडी पाणी उचलत आहे. मात्र, उपलब्ध साठा ऑगस्टपर्यंत पुरेसा राहावा यासाठी दैनंदिन पाणीपुरवठा 1100 ते 1200 एमएलडीपर्यंत मर्यादित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (water) त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सम-विषम तारखांनुसार नवे नियोजन उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिक काळ वापर करता यावा, यासाठी प्रशासनाने सम आणि विषम तारखांच्या आधारे पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक तयार केले आहे. या व्यवस्थेनुसार शहरातील अनेक भागांना आता एक दिवसाआड नळाद्वारे पाणी मिळणार आहे. सकाळ, दुपार आणि रात्री अशा विविध सत्रांमध्ये परिसरनिहाय पाणीपुरवठा करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या भागाचे वेळापत्रक तपासून त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भामा-आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर-पूर्व पुण्यातील काही भागांना सध्या या कपातीतून वगळण्यात आले आहे. तांत्रिक कारणांमुळे या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. ससे गाव परिसरात मात्र सम-विषम तारखांनुसार केवळ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. (water) तसेच वारजे माळवाडी, कर्वेनगरमधील काही भाग, रामनगर, शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे आणि कोंढवे परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यात आला आहे.महापालिकेने नागरिकांना घरातील गळती त्वरित दुरुस्त करण्याचे, पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आणि अनावश्यक पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींसाठी 1800-1030-222 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या किंवा जादा दर आकारणाऱ्या खाजगी टँकर चालकांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पुढील काही आठवड्यांत पावसाचे आगमन लांबल्यास शहरातील पाणीस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग