‘हो, आम्हीच दहशतवाद्यांना पोसले…’ ख्वाजा आसिफनंतर बिलावल भुट्टोनेही कबूल केला पाकिस्तानचा गुन्हा

पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाकडून अलीकडेच दिल्या गेलेल्या वक्तव्यांमुळे देशाच्या दहशतवादाशी संबंधित भूतकाळावर पुन्हा प्रकाश टाकण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी थेटपणे मान्य केले आहे की पाकिस्तानने(Pakistan) गेल्या काही दशकांत दहशतवादी संघटनांना मदत आणि आश्रय दिला. या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाची आणि दहशतवादावरील ‘विरोधाभासी’ भूमिकेची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे.

माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले, “पाकिस्तानचा भूतकाळ आहे हे काही गुपित नाही. आम्ही दहशतवाद्यांना पोसले आणि त्यामुळेच आम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागलं. माझ्या आईची (बेनझीर भुट्टो) हत्या या वाढलेल्या दहशतवाद्यांनीच केली. मी स्वतः त्यांच्या बळींपैकी एक आहे.”

भुट्टोंनी सांगितले की, दहशतवादाच्या लाटा आणि अंतर्गत हिंसाचाराच्या घटनांनी पाकिस्तानला खूप मोठी किंमत मोजायला लावली. मात्र, त्यांच्या मते आता पाकिस्तानने(Pakistan) धडा घेतला आहे आणि आतून सुधारणा केल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, “हे आता इतिहास आहे आणि पाकिस्तान आता अशा कारवायांमध्ये सहभागी नाही.”

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे कबूल केले की, पाकिस्तानने तीन दशके अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी “घाणेरडे काम” केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ही एक मोठी चूक होती, ज्याचे गंभीर परिणाम आम्हाला आज भोगावे लागत आहेत.” या विधानामुळे पाकिस्तानच्या परकीय धोरणातील फसवेपणा आणि दहशतवादाला मिळालेल्या संस्थात्मक पाठबळावर अधिक ठळक प्रकाश पडतो.

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा संवेदनशील घडामोडीनंतर पाकिस्तानकडून दहशतवादासंबंधी दिल्या जाणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय संशय अधिक गडद झाला आहे.

एका सभेत बोलताना भुट्टो म्हणाले की, पाकिस्तानला(Pakistan) शांतता हवी आहे, परंतु भारताकडून चिथावणी मिळाल्यास युद्धालाही मागे हटणार नाही. ते म्हणाले, “जर कोणी आमच्या सिंधूवर हल्ला केला, तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल.” या विधानामुळे भुट्टोंच्या आणि पाकिस्तानच्या दहशतवादाबाबतच्या कथित ‘पश्चात्तापपूर्ण’ भूमिकेच्या पोकळतेपणाचे दर्शन होते.

या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानच्या दुटप्पी आणि विरोधाभासी धोरणाची एकत्रित झलक मिळते. एकीकडे ते स्वतःच्या चुका मान्य करत आहेत, तर दुसरीकडे भारताला धमकीही देत आहेत, जे दहशतवादाच्या विरोधातील त्यांच्या भूमिकेतील गंभीर विसंगती दाखवते. विश्लेषकांच्या मते, या वक्तव्यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दडपण वाढू शकते, विशेषतः तेव्हाच जेव्हा भारतसारख्या देशांकडून सातत्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी घुसखोरीविषयी आवाज उठवला जातो.

पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या या कबुल्यांमुळे दहशतवादाविषयी त्यांच्या भूमिकेतील पोकळपणा जगासमोर उघड झाला आहे. यामुळे पाकिस्तानवर केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही संशयाचा आणि टीकेचा सूर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने केवळ कबुली देऊन आपली जबाबदारी संपवू नये, तर भविष्यात अशा कारवायांना पूर्णतः आळा घालण्यासाठी ठोस आणि पारदर्शक पावले उचलावीत, हीच आता जगाची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात पाकच्या कटाचे पुरावे मिळाले

भर रस्त्यात तणरुणांची स्टंटबाजी; बाईकवरुन तोल गेला अन्…; पुढे जे घडलं थराराक, Video Viral

‘तो’ पंकजा मुंडेंना पाठवत होता अश्लील मेसेज, मग पुढे घडलं भयंकर!