छत्रपती शिवाजी महाराजांचे सी.बी.एस.इ.ला वावडे का?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही जगाला मागे टाकून अव्वल स्थानावर असतो, अशा शब्दात जगातील काही प्रमुख माजी राष्ट्रप्रमुखांनी छत्रपती शिवरायांचा सन्मान केला, गौरव केला आहे. पण भारतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे उपेक्षित राहिले आहेत. सी बी एस इ च्या(CBSE) अभ्यासक्रमात अवघ्या दोन पानात छत्रपती शिवरायांना सीमित करण्यात आले आहे. हा अपमान सहन करण्या पलीकडचा समजला गेला पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर उतरून संबंधितांना “धडा” शिकवण्याची गरज आहे.

देशातील आणि महाराष्ट्रातील इतिहासाच्या पुस्तकात, शालेय अभ्यासक्रमात मुघलांचा इतिहास मोठ्या प्रमाणावर शिकवला जातो. अभ्यासक्रमात (CBSE)मुघलांच्या इतिहासाला कात्री लावण्याचा, त्याला कमी महत्त्व देण्याचा विचार सध्या सुरू आहे. हा विचार प्रत्यक्षात कृतीत येण्यापूर्वीच या धोरणाला काही तथाकथित मंडळी विरोध करू लागली आहेत. वास्तविक मोघल येण्याच्या आधीही या देशात अनेक हिंदू राजानी राज्य केले आहे.

मात्र या हिंदू राजांना इतिहासाच्या पुस्तकाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे आणि त्याबद्दल कोणास काहीही वाटत नाही हे दुर्दैवी आहे. हरियाणा नजीकच्या पानिपत येथे अब्दुलशहा अब्दाली विरुद्ध पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे लढले. तथापि हा शौर्याचा इतिहास आहे की पराभवाचा आहे यावरच चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पानिपतच्या पराभवाचा मराठ्यांनी अवघ्या काही महिन्यात बदला घेऊन मोघलांचे दिल्लीतील तक्त उलथवून टाकले होते.

जगामध्ये जे मोठे योद्धे होऊन गेले त्यामध्ये अव्वल स्थानावर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जगातील 20 पेक्षा अधिक देशांमधील लष्करी महाविद्यालयातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी तंत्राचा स्वतंत्र भाग आहे. जमिनीवरील युद्ध कसे लढायचे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकले पाहिजे आणि म्हणूनच जगातील 20 पेक्षा अधिक देशांमध्ये तेथील लष्करी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा भारतासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. ती एक ऊर्जा आहे. आयुष्यात नैराश्य आले तर संबंधिताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचावे. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले ते कधीही नैराश्याच्या कुशीत जात नाहीत.
शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये(CBSE) छत्रपती शिवाजी महाराज हे प्राधान्याने आणले गेले तर आत्मनिर्भर आणि विवेक बुद्धी असलेल्या युवा पिढ्या तयार होतील हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या पराक्रमांची आणि शौर्याची दखल घेतली गेली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभ्यासक्रमात स्थान दिले जाते आणि याबद्दल कोणालाही काही वाटत नाही. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात वाघ्या कुत्र्याची असलेली समाधी काढून टाकण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यासाठी अनेकांना वेळ आहे.

शिवराज्याभिषेक दिन तारखेप्रमाणे करावा की तिथीप्रमाणे करावा यावरून वाद निर्माण करायला सर्वांना वेळ आहे, खुलताबाद येथील औरंग्याची कबर ठेवावी की उखडून टाकावी यावर चर्चेचा धुरळा उडतो मात्र सीबीएसइ(CBSE) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांना अवघ्या दोन पानात स्थान दिलेले आहे याबद्दल संबंधितांना जाब विचारावा, यासाठी महाराष्ट्रात एक मोठे आंदोलन उभा करावे यासाठी एकत्र येण्याचा विचार कोणीही बोलुन दाखवत नाही हीच खरी शोकांतिका आहे.

वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज हे देशातच नव्हे तर जगभर पोहोचले पाहिजेत यासाठी त्यांच्यासंबंधी इंग्रजी सह अन्य परकीय भाषांमध्ये अनुवादित साहित्य तयार केले पाहिजे आणि त्याचा जगभर प्रसार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जागर केला पाहिजे.

हेही वाचा :

नागरिकांनो सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

कोल्हापुरात सख्ख्या भावाच्या खुनामागे सहा लाखांची सुपारी; निर्जन डोंगरात घडलेल्या खुनाचा उलगडा

फडणवीसांचं उत्तर अन् स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दादा अन् शिंदेंचा होणार गेम?