दरवर्षी २५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात “जागतिक फार्मासिस्ट(Pharmacists) दिन” म्हणून साजरा केला जातो. औषधनिर्मितीपासून ते रुग्णाला योग्य औषध मिळावे यासाठी धडपडणाऱ्या फार्मासिस्ट या आरोग्यसेवेच्या खऱ्या कण्याचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. २००९ साली तुर्कीतील इस्तंबूल येथे झालेल्या इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनच्या बैठकीत याची अधिकृत सुरुवात झाली.कारण २५ सप्टेंबर १९१२ रोजीच FIP ची स्थापना झाली होती. त्यामुळे या दिवशी फार्मसी क्षेत्रातील योगदान अधोरेखित करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला गेला. २००९ पासून हा दिवस प्रत्येक वर्षी जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

फार्मासिस्टची आरोग्य क्षेत्रातील भूमिका
आज आपण डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणतो तो म्हणजे फार्मासिस्ट. ते फक्त औषध देणारे नसून –

नवीन औषधे आणि लसी शोधतात,

औषधांचा सुरक्षित वापर सुनिश्चित करतात,

रुग्णांना योग्य सल्ला देतात,

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचारात्मक मदत करतात.

कोविड-१९ साथीच्या काळात जगभरातील फार्मासिस्टांनी(Pharmacists) खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून भूमिका बजावली. अनेकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवले. त्यामुळेच त्यांना आज समाजात अत्यंत मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

२०२५ ची थीम
यंदाच्या वर्षीची अधिकृत थीम आहे

“आरोग्य विचार करा, फार्मासिस्ट विचार करा”

ही थीम फार्मासिस्ट(Pharmacists) केवळ औषधे विकणारे नसून आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत, हे अधोरेखित करते. रुग्णांच्या आरोग्य प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर फार्मासिस्ट आवश्यक भूमिका बजावतात.भारतामध्ये फार्मसी शिक्षणाचा पाया घालणारे नाव म्हणजे महादेव लाल श्रॉफ. त्यांना भारताचे फार्मसीचे जनक म्हटले जाते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात सर्वप्रथम तीन वर्षांचा फार्मसी अभ्यासक्रम सुरू केला. आज भारतात हजारो विद्यार्थी बी.फार्मा , डी.फार्मा आणि पुढे संशोधनासाठी पीएचडी करून आरोग्य क्षेत्रात योगदान देत आहेत.

बी.फार्मा : १२ वी विज्ञान शाखा (जीवशास्त्र/रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र) उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम.

डी.फार्मा : दोन वर्षांचा डिप्लोमा, ज्यामुळे वैयक्तिक मेडिकल स्टोअर उघडण्याचा किंवा रुग्णालयात काम करण्याचा मार्ग खुला होतो.

शहरी भागात डॉक्टर सहज उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात फार्मासिस्टच अनेकदा पहिला उपचारकर्ता ठरतो. गंभीर रुग्णांना योग्य औषधे देऊन प्राथमिक उपचार करणं, त्यांना वेळेवर रुग्णालयात पोचवणं ही जबाबदारी ते काटेकोरपणे पार पाडतात.आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटरवर कोट्स, स्टेटस शेअर करणे,औषधशास्त्रज्ञांचे अनुभव मांडणे,फार्मसी विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीमा राबवणे यातून हा दिवस अधिक संस्मरणीय केला जातो.फार्मासिस्ट आजारी व्यक्तीला औषध देऊन आजारातून बाहेर काढतो, तर आध्यात्मिक गुरू खऱ्या अर्थाने अशा जीवनपद्धतीची दिशा दाखवतात की ज्यामुळे मुळात आजार होणारच नाहीत. या दोन्ही मार्गांचा उद्देश एकच आहे मानवकल्याण. जागतिक फार्मासिस्ट दिन केवळ एक औपचारिक साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला हे जाणवून देणारा दिवस आहे की फार्मासिस्टशिवाय आरोग्य व्यवस्था अपूर्ण आहे. त्यांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या आरोग्य व्यवस्थेचा सन्मान करणे होय.

हेही वाचा :

अभिषेक शर्माची फटकेबाज अर्धशतकी खेळी; फ्लाइंग किसने रंगत वाढवली!
जया बच्चन यांनी अभिनेत्याला बेदम मारलं तेव्हा… 
ज्येष्ठ नागरिकांना FD साठी कोणत्या बँका सर्वोत्तम?