मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. तरीही सरकारकडून जरांगेंशी चर्चा केली जात नाहीये. त्यामुळे जरांगे यांना चर्चेची दारं बंद आहेत की खुली आहेत? असा सवाल केला जात आहे. त्यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात निर्णायक आंदोलन छेडलं आहे. 15 दिवस उपोषण केल्यानंतर जरांगे आता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे यांना आंदोलन करण्यास कोर्ट आणि पोलिसांनी मनाई केलेली असतानाही ते मुंबईच्य़ा दिशेने निघाले आहेत. ऐन सणासुदीत जरांगे मुंबईत धडकणार असल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून जरांगेंकडे सरकारचा एकही प्रतिनिधी फिरकलेला नाही. त्यांच्याशी संवाद साधलेला नाही. (Jarange) त्यामुळे जरांगे यांना चर्चेची दारं खुली आहेत की नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यावर राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी जरांगेंना चर्चेची दारं खुली आहेत की नाही? असा सवाल करण्यात आला. त्यावर महाजन यांनी थेट उत्तर देणं टाळलं. आता मी ते सांगू शकत नाही. मी त्यातला एवढा प्रमुख माणूस नाहीये. मी मराठा आरक्षण समितीचा एक छोटासा सदस्य आहे. आमचं तर म्हणणं हेच आहे की, यातून मार्ग निघावा. आम्ही 13-14 पैकी 12 मागण्या मान्य केलेल्या आहेत. मी वारंवार तेच सांगतोय. आम्ही कुठे असं म्हणतोय की, 2 मागण्या मान्य करतो, 10 करत नाही म्हणून? आम्ही 12 मागण्या मान्य केलेल्या आहेत. (Jarange) त्याबाबत त्यांना कळवलं सुद्धा आहे. तुमच्या समोरच कळवलंय. मग असं असताना त्यांनी आंदोलनाची भूमिका घेऊ नये. त्यांनी दोन पावलं मागे यावं, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.
जरांगे मुंबईत आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मला वाटतं तो प्रश्न पोलिसांचा आहे. पोलीसच त्यावर निर्णय घेतील. आपण उपोषणाला बसू नका. आणि उच्च न्यायालयानेसुद्धा या संदर्भामध्ये काही आदेश दिलेले आहेत, असं पोलिसांनी जरांगेंना आधीच कळवलं आहे. मला वाटतं ते त्याचं पालन करतील, असं महाजन म्हणाले.
आम्ही जरांगेंना वारंवार तीच विनंती करत आहोत की, बाबा, तुम्ही वारंवार आंदोलन करत आहात. उपोषण करता आहात. मुंबईला येत आहात. पण ही योग्य वेळ नाही. आमच्यासाठी सर्वात मोठा सण कुठला असेल तर तो गणपतीचा आहे. सगळे अबालवृद्ध, महिला, मुलं-मुली सगळे रस्त्यावर असतात. मिरवणुका असतात. कोणाचं तिसऱ्या दिवशी, कोणाचं पाचव्या दिवशी, कोणाचं सातव्या दिवशी, कोणाचं दहाव्या दिवशी विसर्जन असतं आणि अशावेळेला आपण मुंबईमध्ये यावं हे योग्य नाही. उगाच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कुठे तरी अडचण होईल. ट्रॅफिक जॅम होईल. मला वाटतं असं आपण करू नये. आम्ही वारंवार विनंती करूनही तुम्ही मुंबईकडे येत आहात. ही काही योग्य वेळ नाहीये, असं ते म्हणाले.
मंत्रिमंडळात जरांगेंच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त करण्यात आली. याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. जरांगे पाटलांबाबत संपूर्ण महाराष्ट्रच नाराज आहे. नुसते मंत्री नाही, सगळेजण नाराज आहेत. कारण ते ज्या घाण पद्धतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलत आहेत, आई बहिणींचा उल्लेख करून बोलत आहेत ते योग्य नाहीये. त्यामुळे जरांगेंबाबत नाराजी असणं स्वाभाविक आहे. पण तरीसुद्धा आम्ही सकारात्मक आहोत. यातून मार्ग निघाला पाहिजे. त्यांच्या एवढ्या मागण्या मान्य झालेल्या असताना सुद्धा जर आपण मुंबईला येत असाल तर हे काही योग्य नाही. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांची तब्येतही खराब झालेली आहे, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. वारंवार सरकार पाडून टाकेल, मुख्यमंत्र्यांना घरी पाठवून देईल, तुमच्या तीन पिढ्या राजकारणात येऊ देणार नाही, सगळ्यांच्या नावाने शिव्या घालणं… मला वाटतं वारंवार अशा धमक्या देणं काही योग्य नाही. हे अजिबात योग्य नाही. (Jarange) त्यामुळेच पोलिसांनी त्यांना आपला निर्णय कळवलेला आहे, उच्च न्यायालयाने त्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे, त्यांनी सगळ्यांचा आदर करावा, असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?