अडल्या नडल्याचां वाली ‘सुनिल दळवी’!

त्याला कोणी तरी फोन करावा अन् अडचण सांगावी, अन् त्याने मग मदतीसाठी धावत सुटावं. तोपर्यंत धावावं जोपर्यंत त्या गरजू पर्यंत हवी ती मदत पोहोचत नाही. तो ज्या एस.टी महामंडळात नोकरी करतो, त्या लालपरीची चाकेही इतकी धावत नसावीत पण जेव्हा समाजातल्या एका वंचिताला, मित्राला, सरकारी दवाखान्यात गावकडून आलेल्या अशिक्षित फाटक्या माणसाला, विद्यार्थ्याला अगर नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या व्यक्तीला मदत हवी असते, तेव्हा तो तिथे हजर होतो; अगदी देवदूतासारखा. नाव त्याचं सुनिल गुंडू दळवी(Sunil Dalvi)…

सुनिल दळवी(Sunil Dalvi) कोल्हापुरातील राधानगरी वाकीघोल या अतिशय दुर्गम भागातील तरूण, जिथे पक्की सडक नाही, लाईट निट नाही, मोबाईला नेटवर्क नाही. फक्त आजूबाजूला आहे तो सुंदर निसर्ग या वातावरणात वाढताना समाजा प्रतीचं देणं त्याला उमगत गेलं असावं.

स्थानिक आमदारांकडे पाठपुरावा करून या भागातील पायाभूत सोयीसुविधा पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुनीलचे सध्या सुरू आहे. सुनीलच्या या निस्वार्थी धडपडीची दखल घेत आमदार प्रकाश आबिटकर महोदयांनी त्याला विशेष सहकार्य केलं व सामाजिक कामासाठी प्रोत्साहन दिले.

कोल्हापुरातले दोन्ही महापूर, कोकणातील तिवरे धरण फुटी, अगदी कोणतं ही संकट असो, नोकरीला रजा टाकून तो तिथे हजर, अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी.

आमच्या विद्यापीठातल्या ओळखीचं रुपांतर नंतर मैत्रीत झालं. सुनिलला असलेली कुस्तीची आवड, पैलवान प्रदिप तानूगडे हा आमच्या मैत्रीतला मुख्य दुवा… त्याने त्यांच्या प्रेमळ, प्रामाणिक स्वभावामुळे असंख्य माणसांचा गोतावळा जमा करुन ठेवलाय. कुठलं ही वलय, कुठले ही लागेबांधे नसलेला सुनिल त्याच्या एका मेसेज वर गरजुसाठी लाखोची मदत गोळा करु शकतो, याचा मी साक्षीदार आहे.

आपल्या तालुक्यातलं, गाव भागातलं, ओळखी पाळखीचं नसेना का, पण दवाख्यान्यात त्या गरीब पेशंन्टला पाहायला तो जाणार म्हणजे जाणारच, हवी ती मदत पोहोच करणारच. रायगड जिल्ह्यात मध्यंतरी इर्शाळवाडी गावावर डोंगराचा कडा कोसळला आणि अर्ध गावच जमिनीत गाडलं गेलं. या निसर्गाने आपल्याच माणसांना असं दुर्दैवी भू उदरात ओढून घेणं खुप त्रासदायक आहे. आपली नोकरी सोडून, आजारी असतानाही ते दुखणं बाजूला ठेवून समाजाप्रती असणारी तळमळ सुनीला त्या ठिकाणी घेवून गेली. त्या ठिकाणी बचाव कार्यात त्याने मदत केली.

या कामासाठी खुप मोठं काळीज लागतं ते सुनीलकडे नक्कीच आहे. माणसांना वाचवणं, त्यांचे मृतदेह पाहणं, त्यांच्यावर अंतिम संस्कार करणं, याच्या इतकं धाडसी काहीच नाही. एस.टी. मधील आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीमागे तो कायम उभा राहतो.

एस.टी. खात्यातील सेवे बरोबर अडचणीत असलेल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी करत असलेल्या या सेवेसाठी महामंडळाने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्याचा गौरवही केला.

मतीन भाऊ, असं असं घडलंय, अशी अडचण आहे.. काय करायला पाहिजे ? असा त्याचा जेव्हा कॉल येतो तेव्हा मला ही त्या कामासाठी तो रेडी करतो… अन् मग योग्य ठिकाणी मदत पोहचे पर्यत धावाधाव. शिवाजी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्याना एकत्र करत ‘ऊर्जा मैत्रीची मित्रपरिवार’ हा समूह निर्माण करून सर्वाना एकसंघ ठेवण्याच काम सुनील कडून होत आलेलं आहे. सुनीलने कोल्हापूर शहरात ‘रक्तदान चळवळ’ उभी करून सतत मित्रांच्या साह्याने अनेक रक्तदान शिबिरे घेतली आहेत. या शिबिरातून रक्ताचा तुटवडा पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकराजा अभ्यासिका स्थापन करून शिक्षण चळवळ सुरू केली. ‘काव्यांगण’ हे राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आयोजन करुन नवी सांस्कृतिक चळवळ उभा करण्यात सुनिल दळवीचा वाटा महत्वाचा आहे.

या सर्व कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत २०१९ ते २०२३ या सालामध्ये केलेल्या सामाजिक कार्याबद्दल ‘महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार – २०२३’ सुनील दळवी यांना नुकताच जाहीर झाला आहे. मुंबई येथे १३ मे २०२५ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

नोकरी, समाजकार्य, कुटुंब हा सर्व व्याप सांभाळताना त्याला घरातून मिळत असलेलं पाठबळ खूप महत्त्वाचं आहे. स्वाती वाहिनींची सोबत, आई, बापू, चुलते सर्व भावंडांच सुनीलवर असणारं प्रेम आणि त्याच सर्वांवर असणारं प्रेम त्याला ताकद देणार आहे.

लेखन : पै.मतीन शेख, पत्रकार

हेही वाचा :

‘या’ बाईकचा नादच खुळा ! चक्क कंपनी देतेय कारसारखे फीचर्स

‘सीमा, तुला…’; पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या पहिल्या नवऱ्याची थेट धमकी

पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवरील अतिरेकी हल्ल्याचा इचलकरंजीत तीव्र निषेध; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व विश्वहिंदू परिषदेकडून मोर्चा काढला