सांगली – शहराच्या मध्यवर्ती आणि नेहमी वर्दळीच्या पुष्पराज चौकात शुक्रवारी सकाळी थरारक चोरीची घटना घडली. कर्मवीर पतसंस्थेच्या बाहेर एक वृद्ध आपल्या पिशवीत ठेवलेले तब्बल ४० तोळे सोने लॉकरमध्ये जमा करण्यासाठी आले होते. मात्र, आधीच पाळतीवर असलेल्या चोरट्याने काही क्षणांतच स्पोर्टस् बाईकवर येत त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून पलायन केले. या धाडसी चोरीने परिसरात खळबळ उडाली असून, व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घटनेचा तपशील :
चोरट्याच्या या नियोजित कारवाईचा बळी ठरलेले वृद्ध हे सकाळे कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या घरात सध्या लग्नकार्य सुरू असून, त्यानिमित्त काही दिवसांपूर्वी त्यांनी लॅकरमधील दागिने घरी नेले होते. लग्न कार्यानंतर शुक्रवार, सकाळी १०.१५ च्या सुमारास त्यांनी पुन्हा हे दागिने पतसंस्थेत ठेवण्याचा निर्णय घेतला.
साडेनऊच्या सुमारास चालकासोबत चारचाकीतून ते निघाले. पतसंस्थेच्या बाहेर पोहोचल्यावर ते गाडीतून खाली उतरले आणि हिरव्या रंगाच्या पिशवीत ठेवलेले ४० तोळे सोने घेऊन संस्थेच्या दिशेने जात असतानाच, अचानक स्पोर्ट्स बाईकवर आलेल्या चोरट्याने त्यांच्याकडील पिशवी हिसकावली आणि क्षणात शंभरफुटी रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली.
सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाणे आणि एलसीबीचे पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (Video)फुटेज तपासून चोरट्याचा माग घेतला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक विमला एम. आणि निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, चार विशेष पथकांचा शोधमोहीमेसाठी तातडीने पाठवण्यात आले आहे.
पोलीस तपास सुरू
४० तोळे सोन्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये इतकी असून, ही चोरी शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. पोलिसांकडून या चोरीच्या मागचा सूत्रधार आणि त्याचे संभाव्य साथीदार शोधले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
या प्रकारानंतर पोलिसांनी नागरिकांना मोठ्या रकमेचे व्यवहार करताना किंवा दागिने वाहून नेताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
आईला भरधाव कारने उडवताच मुलगा हंबरडा फोडून रडू लागला Video Viral
अरे हे आयपीएल आहे की गल्ली क्रिकेट! ‘या’ कारणामुळे MI VS RR सामना बराचवेळ थांबला
अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2024 चं राज’कारण’