पाणी उशाला, कोरड घशाला!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज यांच्या उत्तम जलव्यवस्थापनामुळे भोगावती खोरे, पंचगंगा खोरे जलसमृद्ध आहे. तथापि कोल्हापूर शहराला कृत्रिम पाणी टंचाईला वारंवार सामोरे जावे लागते आहे. पूर्वी शिंगणापूर पाणीपुरवठा(water) या गळक्या पाईपलाईनमुळे आणि आता काळमवाडी थेट पाईप लाईन योजनेतील वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वारंवार निर्माण होते आहे. थेट पाईपलाईनच्या वारंवारच्या बिघाडामुळे शेकडो कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वकांक्षी योजनेच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. ही योजना पूर्ण होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला असून ती वारंवार बंद पडण्यासाठी म्हणून आता प्रसिद्ध होऊ लागली आहे.

काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईन टाकून कोल्हापूर शहराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा ही अनेक वर्षांची करवीरवासीयांची मागणी होती. या योजनेचा एक भाग म्हणून शिंगणापूर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. ही योजना समारंभपूर्वक सुरू करण्यात आली आणि ती वारंवार पाईपलाईनच्या गळतीमुळे कुप्रसिद्ध होऊ लागली. गळती योजना म्हणून तिला ओळखले जाऊ लागले.

शिंगणापूर पाणीपुरवठा(water) योजनेबद्दल लोकांच्या तक्रारी बेसुमार वाढू लागल्यानंतर काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेतून कोल्हापूर शहराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक भागीदारीतून या योजनेचे इसवी सन 2013 मध्ये भूमिपूजन करण्यात आले. सुमारे 500 कोटी रुपये खर्चाची ही योजना सातशे कोटी रुपयांच्या पुढे पोहोचली. अतिशय कुर्मगतीने या योजनेचे काम सुरू होते. जवळपास दहा वर्षानंतर ही योजना सुरू झाली. योजना पूर्ण होऊन दीड वर्षांचा काळ लोटला असला तरी ती पूर्ण क्षमतेने अद्यापही सुरू झालेली नाही.

कधी पाईपलाईनचे जोड काम, कधी व्हॉल्व फुटले, तर कधी पाईपलाईन फुटली अशा अनेक कारणांनी या योजनेचा पाणीपुरवठा(water) थांबला. दीड वर्षात किमान 50 वेळा योजनेत बिघाड झाला आणि त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला.
एप्रिल महिन्यात अनेकदा शहराचा पाणीपुरवठा तोडण्यात आला होता. शनिवारी, रविवारी दोन दिवस शहराच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे शहराच्या अनेक भागांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता.

सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाणीच नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनलेली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते आहे. महाराष्ट्राच्या शेकडो गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करताना जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनलेली नाही. पण तरीही काही गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.

महाराष्ट्रातील इतर महानगरांच्या तुलनेत कोल्हापूर महानगराला पिण्याच्या(water) पाण्याचे दुर्भिक्ष कधीही जाणवलेले नाही.
त्याला कारण राजर्षी शाहू महाराजांचे जलव्यवस्थापन आहे. पण तरीही मानवनिर्मित चुकांच्यामुळे या शहराला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी या शहराची अवस्था आहे.

थेट पाईपलाईन योजनेला मंजुरी मिळाल्यापासून ती वादाच्या भोवऱ्यात आहे. या योजनेसाठी वापरण्यात येणाऱ्या पाईपच्या दर्जासंदर्भात अगदी सुरुवातीला वाद निर्माण झाला. त्यानंतर या योजनेत संबंधितांनी मोठा ढपला पाडला असा गंभीर आहोत महादेवराव महाडिक यांनी केला होता. पाईपलाईनच्या दर्जाबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असे संबंधितांनी अगदी सुरुवातीपासून सांगण्यास सुरुवात केली होती.

तथापि योजना पूर्ण होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर या योजनेतील काही गंभीर बिघाड आणि तांत्रिक चुका समोर येऊ लागले आहेत. महिन्यातून आठ ते दहा वेळा या शहराचा पाणीपुरवठा खंडित केला जातो आहे. आणि त्याला विविध प्रकारचे कारणे दिली जाऊ लागली आहेत. त्यामुळेच या योजनेच्या कामाच्या दर्जाबद्दलच आता उघडपणे शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत.

हेही वाचा :

100-200 च्या नोटांसंदर्भात RBI ने घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता! ‘या’ भागाला यलो अलर्ट